नांदेड : हवामान खात्याने दिलेल्या इशा-यानुसार मराठवाड्यात उष्णतेची लाट आली आहे. सूर्य आग ओकत असल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ४३ ते ४४ डिग्री सेल्सियस पर्यंत तापमान पोहोचले आहे. त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट निर्माण झाला आहे. सकाळी १० वाजेपासून उन्हाच्या तीव्र किरणामुळे दिवसभर ५ वाजेपर्यंत तापमानात वाढ होत आहे.
त्याचा दिनचर्यावर परिणाम होत आहे. कामाशिवाय नागरिक घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत. प्रचंड तापमानामुळे उष्माघात होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात उष्माघाताचा कक्ष स्थापन करण्यात आला आहे परंतु शासकीय आकडेवारी सद्य परिस्थितीत ० आहे. अद्याप उष्माघाताची एकही घटना घडली नसल्याचे शासकीय आकडेवारी दर्शविते. ही उष्णतेची लाट १२ मे पर्यंत असणार आहे असे हवामान खात्याने घोषित केले आहे.

