अमरावती : अमरावतीमध्ये भाजपच्या उमेदवार नवनीत राणा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या उमेदवारीला प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी जोरदार विरोध केला आहे. बच्चू कडू यांनी महायुतीत असूनही नवनीत राणा यांच्याविरोधात उमेदवार दिला आहे. त्यामुळे नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तर बच्चू कडू यांनी उमेदवार दिल्याने नवनीत राणा आणि बच्चू कडू यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता बच्चू कडू यांनी एक विधान केले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. बच्चू कडू यांच्या दाव्यानुसार रवी राणा यांच्यामुळेच नवनीत राणा यांचा पराभव होणार आहे.
बच्चू कडू यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा दावा केला. दिनेश बूब हा माणूस रवी राणांपेक्षा लाख पटींनी चांगला आहे. चित्रपटाचे जर दृश्य काढले तर त्यात तुम्ही दारू पिताना दिसतात. रवी राणांनी इतक्या व्यक्तिगत पातळीवर खाली जाऊन आमच्या उमेदवारावर आरोप करू नयेत. ज्याचं घर काचेचं आहे, त्यांनी दुस-यांच्या घरावर दगड मारू नयेत. नवनीत राणांचा पराभव करण्यासाठी सर्वांत मोठा हातभार कोणाचा असेल तर रवी राणांचा असेल. नवनीत राणांच्या पराभवाचे सर्वांत मोठे श्रेयही रवी राणांना जाईल. रवी राणा व्यवस्थित वागले असते तर ही वेळ आली नसती, असे बच्चू कडू म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इथे प्रचाराला यावे लागते. तुम्ही उमेदवाराकडे पाहू नका. मला पाहून मतदान करा, असे आवाहन मोदींनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट सांगितले की, आमचा उमेदवार कार्यक्षम नसेल तर मला पाहून मतदान करा, याचा अर्थ स्पष्ट आहे. त्यांचे उमेदवार कार्यक्षम नसल्याचे स्पष्ट झाले आहे, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला.