बीड : प्रतिनिधी
इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर मोदी सरकारच्या योजना कॅन्सल करतील. काँग्रेस आणि इंडिया आघाडी सरकार राम मंदिरही कॅन्सल करेल, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. बीडच्या अंबाजोगाई येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह इंडिया आघाडीवर निशाणा साधला. महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर हे लोक मोदींची किसान सन्मान निधी योजना कॅन्सल करतील. गरिबांना मोफत रेशन देण्याची योजना कॅन्सल करतील, ५५ कोटी गरिबांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळण्याची योजनादेखील काँग्रेस कॅन्सल करेल. इतकेच नाही तर काँग्रेस आणि इंडिया आघाडीवाले राम मंदिरही कॅन्सल करेल.
मी आज तुमच्याकडे काही मागायला आलो आहे. मला तुमचे आशीर्वाद पाहिजे आहेत. माझी संपत्ती तुम्ही आहात. तुम्हीच माझे कुटुंब आहात. माझा देश माझे कुटुंब. एका काँग्रेस नेत्याने ज्याने काही दिवसापूर्वी काँग्रेस सोडली. त्यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. ज्यावेळी राम मंदिराचा निकाल आला, त्यावेळी शहजाद्याने म्हटले होते की, काँग्रेस सरकार आल्यावर राम मंदिरासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बदलणार होते.
गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा
गोपीनाथ मुंडेंसोबत मनाचे संबंध होते, ते नेहमी मराठवाड्याच्या विकासाची चर्चा करायचे. २०१४ मध्ये मला तुम्ही साथ दिली. त्यावेळी गोपीनाथजी सारख्यांना निवडून दिल्लीला घेवून गेलो. पण दुर्दैवाने काही दिवसात मला माझ्या सहका-याला गमवावे लागले. सुषमा स्वराज, अरुण जेटली यांना गमावल्यानंतर माझे हात कट झाल्याची भावना निर्माण झाली. आज मला गोपीनाथजींची आठवण येत आहे, असे मोदी म्हणाले.
इंडिया आघाडीची ४ जूनला एक्सपायरी डेट
लोकसभेच्या तिस-या टप्प्यातील मतदान आज पार पडले. या टप्प्यातही भाजपा आणि एनडीएला भरपूर जन समर्थन मिळाले. त्यामुळे ४ जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट फिक्स झाली आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नगर येथे आयोजित सभेत इंडिया आघाडीवर केली आहे. आज अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ महायुतीची सभा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी ते बोलत होते.