28.4 C
Latur
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रपार्थ पवार मोठे नेते त्यांच्या सुरक्षेसाठी रणगाडा द्यावा

पार्थ पवार मोठे नेते त्यांच्या सुरक्षेसाठी रणगाडा द्यावा

वाय प्लस सुरक्षेवरून रोहित पवारांचा तीव्र संताप

मुंबई : बारामती लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यातील लढत आता रंगत चालली आहे. दोन्ही उमेदवारांचा पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु असताना आता आणखीन एका विषयावरून वाद पाहायला मिळत आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. त्यावरुन, पवार कुटुंबातील सुप्रिया सुळेंच्या मैदानात उतरलेल्या सदस्यांनी पार्थ पवार यांना देण्यात आलेल्या वाय प्लस सुरक्षेवरुन तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. आमदार रोहित पवार यांनी तर, पार्थ पवार हे मोठे नेते आहेत, त्यांच्या सुरक्षेसाठी रणगाडा द्यायला पाहिजे होता, असे म्हटले आहे.

पार्थ पवार यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आल्यानंतर आता आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांनाही सुरक्षा देण्याची मागणी होत आहे. रोहित आणि युगेंद्र यांच्या सुरक्षिततेत वाढ करावी, अशी मागणी थेट खासदार सुप्रिया सुळेंकडून करण्यात आली आहे. पार्थ पवार अजित पवारांचे मोठे चिरंजीव असून त्यांच्याकडे सध्या कुठलेही राजकीय पद .नाही, लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने गेल्या अनेक दिवसांपासून ते आई सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.

गतवर्षी लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवार असलेले पार्थ यंदा प्रचारात दिसून येत आहेत. विशेष म्हणजे गतनिवडणुकीत ज्यांनी पार्थ यांचा पराभव केला, त्याच श्रीरंग बारणेंच्या उमेदवारी अर्जासाठी यंदा पार्थ यांचे वडिल अजित पवार उपस्थित होते. त्यामुळे, राजकारण कुठल्या वळणावर गेलंय, याचीच चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. त्यातच, अजित पवारांचे दोन्ही चिरंजीव प्रचाराच्या रणधुमाळीत उतरले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांना वायझेड सुरक्षा देण्यात आल्याचा मुद्दा वादग्रस्त ठरत आहे. आमदार रोहित पवार यांनी थेट सागर बंगल्याचा उल्लेख करत, पार्थ यांच्या वाय प्लस सुरक्षेवरुन बोचरी व उपहासात्मक टीका केली आहे.

वाय दर्जाची सुरक्षा ही कमी आहे, पार्थ मोठा नेता आहे, त्यांना झेड सेक्युरिटी द्यायला हवी होती. अजून ४-५ गाड्या वाढवायला पाहिजे होत्या. काय झाले आहे, कोयता गँग सामान्य लोकांना त्रास देतेय. मर्डर सामान्य लोकांचे होत आहेत, महिलांवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे, सामान्य लोकांना सुरक्षा देण्याची काही गरज नाही. नेत्यांच्या मुलांना सेक्युरिटी दिली पाहिजे, ते देवेंद्र फडणवीस करत आहेत. सागर बंगल्याचे तेवढेच काम आहे. नेत्यांना सांभाळणे आणि सर्वसामान्यांना वा-यावर सोडणे. सागर बंगला खूप चांगलं काम करत आहे. माझं असं मत आहे की, पार्थला अजून दोन-तीन सिक्युरिटी द्यायला पाहिजे होती, रणगाडा जर कुठे चालत असेल तर रणगाडाही द्यावा, अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी पार्थ यांच्यावर उपहासात्मक बोचरी टीका केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR