छत्रपती संभाजीनगर : राज्यात आज छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या कलामध्ये सत्ताधारी महायुती आघाडीवर असल्याचे चित्र आहे. छत्रपती संभाजीनगरमध्येही ४ ठिकाणी मतमोजणी सुरू आहे. या चारही ठिकाणी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व नागरिकांनी निकाल ऐकण्यासाठी गर्दी केली आहे. त्यातच उस्मानपुरा येथील शासकीय अभियांत्रिकी मतमोजणी केंद्रावर मतमोजणी सुरू होण्यापूर्वी पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी तुफान लाठीमार केला. त्यात शिंदे गटाचे नेते तथा शहराचे माजी महापौर विकास जैन जबर जखमी झाले.
या घटनेचा एक व्हीडीओ व्हायरल झाला आहे. त्यात पोलिस कर्मचारी नागरिकांना घेरून काठ्यांनी मारहाण करताना दिसून येत आहे. एक व्यक्ती पोलिसांच्या मारापासून वाचण्यासाठी झाडाजवळ बसला असताना पोलिस त्याच्यावरही काठ्यांचा प्रहार करताना दिसून येत आहेत. केवळ आत जाण्याच्या विनंतीवरून ही मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे. शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
काय म्हणाले मंत्री संजय शिरसाट?
संजय शिरसाट म्हणाले, आज मतमोजणी आहे. मतदान नाही. या लोकांना कळत कसे नाही. त्यांना काही सेन्स नाही का? जखमी झालेले कार्यकर्ते आमचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्याकडे ओळखपत्र आहे. त्यांना जनावरासारखे मारले. यांना कसली मस्ती आहे. एक अधिकारी इथे दिसत नाही. यांच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. या पद्धतीने मारहाण होत असेल तर हा पोलिसांचा मस्तवालपणा आहे. ही मस्ती कुठे तरी उतरली पाहिजे. हे माजी महापौर आहेत. त्यांचा हात मोडला. ते मतदान करायला जात होते का? हा मतमोजणीचा टाईम आहे ना. ते पुढे म्हणाले, मतमोजणीसाठी सगळीकडे बॅरिकेड्स लावण्यात आलेत.
सामान्य माणसांना प्रवेश नाही असे असताना जे प्रतिनिधी आहेत, ज्यांच्याकडे ओळखपत्र आहे, त्यांना आत जाण्यास तुम्ही मज्जाव का करता? ही कोणती मस्ती आहे तुमची? मतदान सुरू असते तर समजू शकतो आपण. पण हा बळाचा वापर हा मस्तवालपणा आहे. पत्रकारांनाही मारहाण झाली. हा सागर देशमुख नामक जो कोणता प्राणी आहे ना, त्याची मस्ती उतरली पाहिजे. त्याच्यावर तातडीने गुन्हा दाखल झाला पाहिजे. मी सीपींशी बोललो. सीपी तिकडून बोलतात की, माझे अधिकारी तिकडे आहेत. त्यांना स्पॉटवर यायला काय झाले? नेमकी परिस्थिती काय आहे हे ते इथे येऊन पाहू शकत नाहीत का? असा सवालही शिरसाट यांनी यावेळी उपस्थित केला.
















