सिंधुदुर्ग – मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे फूस झालेला लवंगी फटाका आहेत, त्यांच्या सभेचा परिणाम होणार नाही अशी बोचरी टीका उबाठा गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी केली आहे. राज ठाकरे आणि नारायण राणे एकाच व्यासपीठावर येणार असून कोकणात राज ठाकरेंची तोफ धडाडणार या प्रश्नावर पत्रकारांनी विनायक राऊतांना प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले की, राज ठाकरे फूस झालेली लवंगी फटाकी असून त्याचा कोकणावर काही परिणाम होणार नाही. लवंगी फटकी असल्याने अजिबात फरक पडणार नाही असं म्हटलं आहे.
तर दीपक केसरकराच्या वक्तव्याचे हसू येते. ज्या नारायण राणेंनी यांना लाथाडलं, सत्तेसाठी त्यांचे तळवे चाटण्याची वेळ आलीय. यापेक्षा दुसरा विनोद कोणता आहे. केसरकरांनी कोकणवासियांना शहाणपण शिकवू नये. शिक्षणाचा बट्ट्याबोळ करणारा शिक्षणमंत्री म्हणून दीपक केसरकरांचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल असं प्रत्युत्तर विनायक राऊतांनी दिले आहे.
दरम्यान, मी साधा खासदार असताना कोकणात जे केलंय ते केसरकर आयुष्यात कधी करू शकले नाहीत. इथलं मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटलचा सत्यानाश केसरकरांनी केला आहे. तुम्हाला शरद पवारांनी आमदार केले, उद्धव ठाकरेंनी मंत्री केले. खाल्ल्या ताटात तुम्ही घाण करणारे आहेत. आज आम्ही संघटनेसोबत राहिलो आहे. संघटना वाढीसाठी काम करतोय हे आमचे मोठेपण आहे. ४ जूननंतर नारायण राणेंची झोप उडेल असंही खासदार विनायक राऊतांनी म्हटले.