नवी दिल्ली : संधिवात हा केवळ वयोवृद्धांमध्ये होणारा आजार आहे असा गैरसमज समाजात आढळून येतो. सध्या २०, ३० आणि ४० या वयोगटातील तरुणांमध्येही संधिवाताचे प्रमाण वाढताना दिसत आहे. सांध्यांमध्ये होणारी सूज, वेदना, स्रायुंचा कडकपणा आणि हालचालींमध्ये अडथळा यामुळे दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सुरुवातीच्या लक्षणे ओळखून वेळीच उपचार घेणे अत्यंत गरजेचे आहे.
संधिवातामुळे सांध्यांमध्ये दाह(इन्फ्लेमेशन) निर्माण होतो. त्यामुळे वेदना, सूज, कडकपणा आणि सांध्यांची हालचालींवर मर्यादा येऊ शकतात. भारतात संधिवाताच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून त्यात तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. व्यायामाचा अभाव, पूर्वी झालेल्या सांध्यांच्या दुखापती, स्वयंप्रतिकार (ऑटोइम्यून) विकार, आनुवंशिकता तसेच चुकीची जीवनशैली यांसारख्या कारणांमुळे कमी वयातही संधिवाताचा धोका वाढतो. सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास सांध्यांचे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते, असे पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयाचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. अनुप गाडेकर सांगतात.
खालील लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
– अनेक आठवड्यांपासून होणारी सततची सांधेदुखी
– सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटांपेक्षा जास्त काळ सांध्यांमध्ये कडकपणा जाणवणे
– सांध्यांभोवती सूज किंवा स्पर्श केल्यावर वेदना होणे
– वाकणे, चालणे, जिने चढणे किंवा हातांचा वापर करताना अडचणी येणे
– विश्रांतीनंतर किंवा शारीरिक हालचालीनंतर वेदना वाढणे
– सांध्यांची हलचाल करताना कटकट किंवा घर्षणासारखा आवाज किंवा संवेदना जाणवणे
– सतत थकवा किंवा ऊर्जा कमी झाल्याचे जाणवणे
– हातांची बोटे, मनगट, पाय किंवा गुडघ्यांमधील सांधे वारंवार दुखणे
कोणाला अधिक धोका?
ज्यांच्या कुटुंबात संधिवाताचा इतिहास आहे, लठ्ठपणा आहे, खेळताना किंवा इतर कारणांनी सांध्यांना दुखापत झाली आहे, स्वयंप्रतिकार विकार आहेत, बैठी जीवनशैली आहे किंवा शरीराची ठेवण (पोश्चर) योग्य नाही, अशा व्यक्तींमध्ये संधिवाताचा धोका अधिक असतो. सांधेदुखी किंवा स्रायुंचा कडकपणा काही आठवड्यांपेक्षा जास्त काळ कायम राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. केवळ वेदनाशामक गोळ्या घेऊन उपचार पुढे ढकलणे टाळावे, कारण त्यामुळे दीर्घकालीन नुकसान होण्याची शक्यता असते.
वेळीच उपचाराने संधिवातावर नियंत्रण शक्य
संधिवाताच्या उपचारांमध्ये औषधे, फिजिओथेरपी, वजन नियंत्रणात ठेवणे, नियमित व्यायाम करणे तसेच जीवनशैलीतील आवश्यक बदल यांचा समावेश असतो. अनेकजण सांधेदुखीकडे अतिश्रम किंवा व्यायामामुळे होणारा त्रास म्हणून दुर्लक्ष करतात. मात्र, वेळीच निदान आणि योग्य उपचार घेतल्यास संधिवात हा प्रभावीपणे नियंत्रणात ठेवता येतो. त्यामुळे रुग्ण दीर्घकाळ सक्रिय, स्वावलंबी आणि वेदनामुक्त आयुष्य जगू शकतो. तरुण वयातील सांधेदुखीकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि तुमच्या सांध्यांचे आरोग्य जपा.
















