नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडलेल्या तेलुगू देसम पक्षाने पुन्हा एकदा भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतला. या पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यामुळे ही अटकळ बांधलीजात होती. याशिवाय, अभिनेते पवन कल्याण यांचा जनसेवा पक्षही ‘एनडीए’मध्ये सहभागी झाला आहे. याचसोबत आता बीजेडी देखील भाजप सोबत येणार असे संकेत मिळाले आहेत.
आगामी निवडणूक एकत्रितपणे लढण्याची तत्त्वत: तयारी ‘टीडीपी’ आणि भाजपने दर्शविली असून जागावाटपाबाबत अद्याप चर्चा सुरू आहे, असे ‘टीडीपी’चे खासदार के. रवींद्रकुमार यांनी सांगितले.
लोकसभा आणि आंध्र प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी ‘एनडीए’बरोबर आघाडी करण्याच्या दृष्टीनेच चंद्राबाबू नायडू यांनी अमित शहा आणि नड्डा यांची भेट घेतली होती, असेही कुमार यांनी स्पष्ट केले. या भेटीवेळी पवन कल्याण हेदेखील उपस्थित होते. आंध्र प्रदेशात लोकसभेच्या २५ जागा असून विधानसभेचे १७५ मतदारसंघ आहेत. भाजपला यापैकी किती जागा सोडाव्यात, यावर अद्याप तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये एकमत झालेले नाही. भाजपला लोकसभेच्या आठ आणि विधानसभेच्या २० जागा हव्या असल्याचे समजते.
‘बीजेडी’सोबत युती शक्य
ओडिशामध्ये बिजू जनता दलाबरोबरही युती करण्याच्या प्रस्तावावर भाजपमध्ये विचार होत आहे. भाजपला ओडिशामध्ये गेल्या निवडणुकीत केवळ आठ जागांवर विजय संपादन करता आला होता. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला अधिक जागा व विधानसभा निवडणुकीत बीजेडीला अधिक जागा, असा प्रस्ताव भाजपकडून ‘बीजेडी’ला दिला आहे.