लातूर : येथील हॉटेल अंजनी मध्ये जी २४ च्या कार्यकर्त्याची व जिल्ह्यातील बुध्दीवादी विचारांच्या मान्यवरांची एक महत्वपूर्ण बैठक प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी झालेल्या चर्चेत भाजपने देव आणि धर्माचा वापर करून भारताची सत्ता काबीज करून तब्बल १० वर्षापासून भारतात जातीयता, धर्मांधता, द्वेष पसरवून संविधान मोडीत काढले आहे .सरकारी कारखाने आणि संसाधने विकून देशाला कंगाल बनविले आहे . एवढे करूनही पंतप्रधान मोदी विश्वगुरू झाल्याची अफवा पसरवीत आहेत. त्यांनी देशाच्या संविधानिक स्वायत्त संस्थाना बटीक बनवून त्यांचा गैरवापर केला आहे. त्यामुळे लोकशाही आणि संविधान धोक्यात आले आहे अशा आणिबाणीच्या प्रसंगी समाजातील प्रबुध्द वर्गाचे मौन धोकादायक ठरू शकते. म्हणून या निवडणूकीत तटस्थता न बाळगता धर्मनिरपेक्ष तत्वाची जपणूक करण्यासाठी बुध्दीवादी वर्ग घराबाहेर पडून निवडणूक प्रक्रियेत सक्रीय झाला आहे.
जाहिर पत्रके, पत्रकार परिषदा, कॉर्नर बैठका, पदयात्रा आणि जाहिर सभांचे आयोजन करण्याचे यावेळी निश्चीत झाले. बैठकीच्या सुरूवातीस यानिमीत्ताने काढलेल्या जाहिर पत्रकाचे माजी कुलगुरू जनार्दन वाघमारे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
या बैठकीमध्ये माजी न्यायाधिश आर. वाय.शेख, प्रा.अर्जुन जाधव, माधव बावगे, प्रा.शिवाजी शिंदे, श्रीहरी कांबळे, डॉ. असद खान, प्रा. रेड्डी , पी.जी.भीसे , प्रा.एम.बी. पठाण, अॅड. उगले, डॉ. गणेश गोमारे, कॉ. विठ्ठल भोसले, प्रा.सुभाष भिंगे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना प्रचारासाठी काही सूचना केल्या. नरसिंग घोडके यांनी बैठकीचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन केले तर माधव बावगे यांनी आभार मानले. या बैठकीस शहरातील परिवर्तनवादी विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.