मुंबई : राज्यातील शिक्षक भरतीची वाट पाहणा-या लाखो उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून अनेक महिन्यांपासून रखडलेली भरती प्रक्रिया आता वेगाने पुढे सरकणार असून राज्यभरात मेगा शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. शिक्षण विभागाने सर्व शाळांना ३१ मे २०२६ पर्यंत रिक्त जागांवर शिक्षक भरती करण्याचे आदेश दिले आहेत.
या भरती प्रक्रियेत एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. केवळ सध्या रिक्त असलेल्या जागाच नव्हे, तर मे २०२६ पर्यंत सेवानिवृत्त होणा-या शिक्षकांमुळे निर्माण होणा-या संभाव्य रिक्त पदांचाही समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे उपलब्ध पदांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. परिणामी अधिकाधिक पात्र उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार असल्याने या निर्णयाचे स्वागत होत आहे.
भरती प्रक्रियेची वेळापत्रक देखील निश्चित करण्यात आले आहे. १ मे ते ३१ मे या कालावधीत सर्व शाळा व्यवस्थापनांनी त्यांच्या रिक्त पदांची माहिती ‘पवित्र’ पोर्टलवर नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतर जून महिन्यात उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार आणि गुणांच्या आधारे शाळांचे पसंतीक्रम निवडण्याची संधी मिळणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडणार असल्याने पारदर्शकता वाढणार आहे.
‘टैट’परीक्षेला मोठा प्रतिसाद
गेल्या वर्षी झालेल्या ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी’ (टीएआयटी) परीक्षेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. सुमारे २ लाख २८ हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २ लाख ११ हजार ३०८ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. या उमेदवारांपैकी १ लाख ७० हजार १०८ जणांनी स्व-प्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण केली आहे. या पात्र उमेदवारांना भरती प्रक्रियेत प्राधान्य दिले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
‘पवित्र’ पोर्टलमधून प्रक्रिया पार पडणार
या भरतीत वशिलेबाजीला आळा घालण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. ‘पवित्र’ पोर्टलच्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रिया पार पडणार असल्यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होणार आहे. तसेच सर्व शाळांना त्यांच्या आरक्षणानुसार बिंदुनामावली (रोस्टर) तपासूनच जाहिरात देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि न्याय्य होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास मदत
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षक पदे पूर्णपणे गुणवत्तेनुसार, मुलाखतीशिवाय भरली जाणार आहेत. तर खासगी संस्थांना प्रत्येक एका जागेसाठी दहा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्याची मुभा देण्यात आली आहे. उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार विविध शाळांची निवड करता येणार आहे. या सर्व प्रक्रियेच्या अंमलबजावणीमुळे राज्यातील शिक्षकांची कमतरता दूर होऊन शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास मदत होईल असा विश्वास शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
















