हिंगोली : प्रतिनिधी
इस्रायल-इराण संघर्षाची झळ आता भारतालाही बसू लागली आहे. घरगुती सिलिंडरच्या किंमती वाढल्या असून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. तर इंधनाची देखील मोठ्या प्रमाणावर टंचाई निर्माण होण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जोरदार हल्लाबोल केलाय. ‘देशाच्या परिस्थितीकडे पाहता आता ‘नरेंद्र सरेंडर’ म्हणण्याची वेळ आली आहे, असे वक्तव्य करत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
शेतमालाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी कळमनुरी ते हिंगोली दरम्यान आयोजित पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या पदयात्रेद्वारे शेतक-यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, अमेरिकेसोबत केलेल्या करारामुळे शेती व्यवसायाची पीछे हाट होतानाचे चित्र आहे. इराणच्या नाकेबंदीमुळे भारताला होणारा एलपीजी पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडरचा तीव्र तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय धोरण ठीक नसल्याने इंधनासारख्या समस्या देशामध्ये निर्माण झालेल्या आहेत. केंद्र सरकार योग्य पद्धतीने काम करत नसल्याने हा आक्रोश आहे. सिलेंडरच्या किमती वाढलेल्या आहेत. ‘नरेंदर सरेंडर’ म्हणण्याची वेळ आलेली आहे, याबद्दल मी दु:ख व्यक्त करतो, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.
संसदेत चर्चेला वाव दिला जात नाही
दरम्यान, हर्षवर्धन सपकाळ यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कामकाजावरही टीका केली. संसदेत सत्ताधा-यांना प्रोत्साहन दिले जाते, तर विरोधकांना बोलू दिले जात नाही, असा आरोप त्यांनी केला. ‘ संसदेत चर्चेला वाव दिला जात नाही. पार्लमेंटरी शब्द उच्चारण्यावरही मर्यादा आणल्या जात आहेत. लोकशाहीला मर्यादित करण्याचा प्रयत्न सुरू आहे,’ असेही ते म्हणाले.
भारतीय टीमचे अभिनंदन
हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, सर्व भारतीय टीमचे अभिनंदन. यापूर्वीसुद्धा त्यांनी अशाच पद्धतीने वर्ल्ड कप आणला होता. याही टीमचं मी अभिनंदन करतो. आगामी काळामध्ये क्रिकेटमध्ये प्रत्येक वर्ल्ड कप आपल्याला आणायचा आहे. फार आशादायी चित्र विजयामुळे निर्माण झाले आहे, असे त्यांनी म्हटले.

