हैदराबाद : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचा भाऊ अकबरूद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकांची मालमत्ता घेऊन घुसखोरांना वाटण्याच्या वक्तव्यावर जोरदार प्रहार केला आहे.
ते म्हणाले की, आम्ही या देशाचे घुसखोर नाही, तर देशाचे रहिवासी आहोत. हा देश आमचा होता, आमचा आहे आणि आमचाच राहील. आम्हाला बाहेर काढण्यासाठी कोणीही जन्माला आलेले नाही, असा दावाही ओवेसी यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, मोदी मुस्लिमांना जास्त मुले जन्माला घालणारे म्हणतात. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कुटुंबात सात मुले आहेत. गृहमंत्री अमित शहा यांच्याही कुटुंबात सात मुले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबात सहा मुले आहेत. या देशाला ताजमहाल, कुतुबमिनार, लाल किल्ला, जामा मस्जिद आणि चार मिनार देणारे आपणच आहोत. हा देश आम्ही सजवला आहे. आम्ही घुसखोर नाही, असे ओवेसी म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राजस्थानमधील बांसवाडा येथील जाहीर प्रचार रॅलीला संबोधित करताना म्हटले होते की, काँग्रेस सत्तेत आल्यास लोकांची मालमत्ता घेऊन मुस्लिमांमध्ये वाटप करेल. पंतप्रधान मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विधानाचा हवाला देताना हे सांगितले होते, ज्यात त्यांनी म्हटले होते की, देशाच्या संसाधनांवर अल्पसंख्याक समुदायाचा पहिला अधिकार आहे, पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यामुळे देशभरातील विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली असून, काँग्रेसने मोदींच्या या वक्तव्यावर निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. निवडणूक आयोग पंतप्रधान मोदींच्या या मुस्लिमविरोधी वक्तव्यावर काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.