रत्नागिरी : होय, माझी चूक झाली, मोदींना मत द्या हे सांगायला मीच तुमच्याकडे आलो होतो, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी कोकणवासियांची माफी मागितली आहे. उद्धव ठाकरे यांनी रविवारी रत्नागिरीमध्ये विनायक राऊत यांच्या प्रचारसभेत चौफेर फटकेबाजी केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपसह नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यावरही नाव न घेता जोरदार टीका केली आहे.
मी मुख्यमंत्री असताना कोरोनाचे संकट आले, दोन वादळं आली, त्यामध्ये मी अडकून राहिलो. पण, त्याच्यात अडकलो नसतो, तर तुमच्या मागण्या-मागण्या राहिल्या नसत्या, ते स्वप्न मी पूर्ण करून दाखवले असते. जे मी बोलतो, ते करतो. दोन लाखांपर्यंतची कर्ज माफी केली, ती मिळाली की नाही, लोक मिळाली सांगतात. नियमित कर्ज फेडणा-यांना ५० हजार द्यायला सुरुवात केली होती, पण यांनी गद्दारी करुन सरकार पाडले आणि ती बंद केली. वादळग्रस्तांना मदत मिळाली होती की नाही.
उद्धव ठाकरेचे वचन की मोदीची गँरेंटी
चंद्रावर पूल करेन, असे मी बोलत नाही. जे शक्य असेल ते बोलतो आणि करुन दाखवतो. तुमच्या समोर आहे. आता १० वर्षांच्या थापांची मोदी गँरेंटी आणि दुसरीकडे माझे वचन. मी वचननाम्यात जे वचन दिले, ते मी करुन दाखविणार. तुमची निवड तुमच्याकडे आहे. उद्धव ठाकरेचे वचन की मोदीची गँरेंटी, याचे उत्तर महाराष्ट्राने द्यायचे आहे असे ठाकरे यावेळी म्हणाले.
अख्खा कोकण जणू यांनी विकायला काढलाय
उद्धव ठाकरे म्हणाले, यांची गँरेंटी म्हणजे कशी, एक अकेला सबपे भारी, आजूबाजूला भ्रष्टाचारी, अशी यांची गँरेंटी आहे. सगळे भ्रष्टाचा-यांची फौज घेऊन हे आपल्यावर चाल करुन येत आहेत. अख्खा कोकण जणू यांनी विकायला काढलाय. नाणार, जैतापूर, बारसूमध्ये जे झाले, आपल्याला काही कळायच्या आत परप्रांतीयांनी इकडे जमिनी केव्हा बळकावल्या कळलेच नाही.
किनारपट्टीचा विकास मोठा धोका
पुढचा धोका म्हणजे किनारपट्टीचा विकास हे सिडकोकडे देत आहेत. सिडको म्हणजे यांचे सगळे बगलबच्चे, सूट-बूटच सरकार. हा निसर्गाच्या वैभवाने नटलेला माझा कोकण, कॉन्ट्रॅक्टरच्या खिशात आपण देणार का? ज्याचा भ्रष्टाचार जेवढा मोठा त्याला केंद्रात मंत्रीपद देणार, राज्यात मंत्रीपद देणार, ७० हजार कोटीचा घोटाळा असेल तर उपमुख्यमंत्री करणार, त्याच्याहून मोठी घोटाळा असेल, तर मुख्यमंत्री असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारसह शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारवरही जोरदार टीका केली आहे.