अमरावती : लोकसभा निवडणुकांनिमित्त माजी कृषी मंत्री शरद पवार अमरावती येथे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी आले होते.
या सभेत बोलताना शरद पवार यांनी खासदार आणि भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचे नाव न घेता टीका केली. पवार म्हणाले, पाच वर्षांपूर्वी मी इथे एका अपक्षाला पाठींबा दिला होता. त्यांच्यासाठी मते मागितली होती. ती माझी चूक होती. आणि आज मी त्यासाठी माफी मागतो. यावेळी आपल्या भाषणाच्या सुरुवातील शरद पवार म्हणाले, आज मी याठिकाणी आलोय ती, अमरावतीकरांची माफी मागायला आलोय. कारण पाच वर्षांपूर्वी लोकसभेच्या उमेदवाराला मतदान करा म्हणून मी काही सभा घेतल्या, लोकांनी माझा संदेश स्वीकारला व आम्ही ज्यांना पाठींबा दिला त्यांना खासदार केले. पण गेल्या पाच वर्षांतील या खासदारांचा अनुभव बघितल्यानंतर माझ्या मनात अस्वस्थता होती. त्यामुळे मला सतत वाटायचे की, कधीतरी जावे आणि अमरावतीकरांची माफी मागावी आणि सांगावे आमच्याकडून चूक झाली. ती चूक आता पुन्हा कधी होणार नाही.
यावेळी पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समाचार घेतला. ते म्हणाले, यापूर्वी मी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि मनमोहन सिंग यांच्यासारख्या पंतप्रधानांबरोबर काम केले आहे. ते लोकांमध्ये जायचे आणि भारताची प्रगती कशी करता येईल याबद्दल लोकांना सांगायचे. पण आताचे पंतप्रधान कुठेही गेले की, पहिल्यांदा माजी पंतप्रधान जवाहर लाल नेहरू आणि काँग्रेसवर टीका करत सुटतात. त्यांना माहित हेव की, स्वातंर्त्यासाठी जबाहरलाल नेहरू यांनी १८ वर्षांचा तुरुंगवास भोगला आहे. स्वातंर्त्यानंतर देश लोकशाही पद्धतीने कसा चालवावा यासाठी रचणा केली आहे. त्यामुळे नेहरू यांचे योगदान कोणीही पुसू शकत नाही, अशा शब्दात पवारांनी पंतप्रधान मोदींना आरसा दाखवला.
दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अमरावतीमधून काँग्रेस व महाविकास आघाडीकडून बळवंत वानखेडे यांना संधी देण्यात आली आहे. तर गेल्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठींब्यावर विजयी झालेल्या खासदार नवनीत राणा यावेळी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. दरम्यान महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या बच्चू कडू यांनी येथे बंडखोरी करत प्रहार पक्षाकडून दिनेश बूब यांना उभे केले आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे.