इटानगर : अरुणाचल प्रदेशातील लोअर सियांग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या ढगफुटी आणि भूस्खलनाने मोठे नुकसान झाले असून, १४ गावांतील ३,१०० हून अधिक नागरिक या आपत्तीमुळे प्रभावित झाले आहेत. अचानक आलेल्या पुरात किमान तीन जणांचा मृत्यू झाला असून हजारो नागरिक प्रभावित झाले आहेत.
पूराच्या पाण्यामुळे अनेक वाहने वाहून गेली असून डुकरे, कुक्कुटपालनातील पक्षी आणि इतर पाळीव जनावरांची मोठा बळी गेला आहे. रोहे गावातील मोठा भूभाग वाहून गेल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ग्रामस्थांना घरे सोडून शेतातील तात्पुरत्या झोपड्यांमध्ये आश्रय घ्यावा लागला. पूरामुळे गावाला जोडणारा झुलता पूल वाहून गेला असून, पाणीपुरवठा व्यवस्था, वीज खांब आणि विद्युत वाहिन्याही नष्ट झाल्या आहेत. जिल्हा प्रशासन, भारतीय सैन्य, भारत-तिबेट सीमा संघटना(बीआरओ), राज्य पोलीस आणि स्थानिक स्वयंसेवक यांच्या मदतीने युद्धपातळीवर बचाव व मदतकार्य सुरू आहे. रस्ते सुरू करणे, तात्पुरता पूल उभारणे, अन्नधान्य, पिण्याचे पाणी आणि वीजपुरवठा पूर्ववत करणे, तसेच बाधित कुटुंबांना नुकसानभरपाई व पुनर्वसन करण्यासाठी प्रशासनाकडून सर्वेक्षण सुरू आहे.
ईशान्य भारताला मुसळधार पावसाचा तडाखा
ईशान्य भारतात सुरू असलेल्या मुसळधार मान्सून पावसामुळे आसाम, मेघालय, सिक्कीम आणि नागालँड या राज्यांमध्ये पूर आणि भूस्खलनाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. संपर्क तुटलेल्या गावांमध्ये हेलिकॉप्टरद्वारे मदत पोहोचविली जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे.
५०० कुटुंबांचा संपर्क तुटला
जिल्हा माहिती व जनसंपर्क अधिकारी ऑगस्टी जमोह यांनी दिलेल्या माहितीनुसार, नारी-कोयू विधानसभा मतदारसंघातील अनेक भागांमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. तबिरिपो साकू, लोगलू, रोहे आणि कोयू या गावांसह अनेक भागांचा रस्ते संपर्क पूर्णपणे तुटला असून, सुमारे ५०० कुटुंबे बा जगापासून विलग झाली आहेत.
















