मुंबई : प्रतिनिधी
राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून कोकण, मुंबई, पुणे, ठाणे, रायगड आणि घाटमाथा भागात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आळंदीमध्ये इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडत महापुराचे रूप धारण केले आहे. नदीवरील चारही बाजूने पुराने घेरले आहे.
इंद्रायणी नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदीने रौद्ररूप धारण केले आहे. आळंदी शहरात प्रवेश करणारे चारही पूल पाण्याखाली गेल्याने शहरात ये-जा पूर्णपणे बंद झाली आहे. नदीकाठचे घाट, मंदिर परिसर, धर्मशाळा, दुकाने आणि अनेक भाग पुराच्या पाण्याखाली गेले आहेत.
आषाढी वारीसाठी देशभरातून आलेल्या शेकडो वारक-यांना याचा मोठा फटका बसला आहे. प्रशासनाने विविध धर्मशाळा आणि दर्शन मंडपांमध्ये अडकलेल्या सुमारे २५० वारक-यांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. नदीकाठी उभारण्यात आलेले चेंजिंग रूम आणि तात्पुरत्या सुविधा पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत.
वारकरी आणि भाविकांना आळंदीत न येण्याचे आवाहन
पूरस्थिती गंभीर होत असल्याने प्रशासनाने अत्यंत महत्त्वाचे सार्वजनिक आवाहन जारी केले आहे. आळंदीच्या दिशेने प्रवास करणा-या सर्व वारकरी, भाविक आणि नागरिकांनी ज्या ठिकाणी आहेत तेथेच सुरक्षित थांबावे आणि परिस्थिती सुरळीत होईपर्यंत आळंदीत येण्याचा प्रयत्न करू नये, असे स्पष्ट सांगण्यात आले आहे. नदीपात्र, घाट, पूल किंवा पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवर जाणे टाळावे, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि केवळ प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिसांचेही कडक निर्देश
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयानेही वारकरी, दिंडी प्रमुख आणि भाविकांसाठी स्वतंत्र सूचना जारी केल्या आहेत. आळंदी आणि देहू येथील मंदिर परिसर तसेच धर्मशाळांमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे पुढील प्रवास करू नये, सुरक्षित ठिकाणीच थांबावे आणि पोलीस व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे-मुंबई एसटी सेवा अनिश्चित काळासाठी बंद
मुंबई-पुणे मार्गावर दरड कोसळल्याने पुढील आदेश येईपर्यंत पुणे-मुंबई दरम्यानची सर्व एसटी बस सेवा बंद करण्यात आली आहे. सकाळी पुण्याहून मुंबईकडे निघालेल्या चार एसटी बस उर्से टोलनाका परिसरात अडकल्या होत्या. त्या सुरक्षितपणे पुन्हा पुण्याकडे परत पाठवण्यात आल्या. रस्ता खुला होईपर्यंत प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करू नये, असे एसटी प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
धरणांत वाढू लागला पाणीसाठा
पुणे शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही चांगला पाऊस होत असल्याने धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे.
सध्या प्रमुख धरणांमधील पाणीसाठा पुढीलप्रमाणे
खडकवासला १४.९७ टक्के, पानशेत २२.९९ टक्के, वरसगाव १७.६६ टक्के, टेमघर२.३१ टक्के,या चार धरणांमधील एकूण पाणीसाठा १७.४६ टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र, गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा ६०.६२ टक्के होता.
उजनी धरणासाठी दिलासादायक बातमी
पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटात सुरू असलेल्या पावसामुळे दौंड बंधा-यातून भीमा नदीमार्गे उजनी धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. सध्या सुमारे ६,८८३ क्युसेक पाणी धरणाकडे येत आहे. सध्या उजनी धरणाची पातळी उणे २८ टक्क्यांच्या आसपास असली तरी आता सुरू झालेली आवक पुढील काही दिवसांत धरणासाठी मोठा दिलासा ठरणार असल्याचे मानले जात आहे.
















