परभणी : मानवत शहरात गुन्हेगारी घटनांत वाढ झाल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. येथील शिवसेनेचे गटनेते अॅड. विक्रमसिंह मधुकरराव दहे आणि त्यांचे मोठे भाऊ अभयसिंह दहे यांच्यावर दि. ८ जुलै रोजी प्राणघातक हल्ला करण्यात आला. शहरातील गावगुंड बरसातसिंग बावरी याने साथीदारांसह केलेल्या या जीवघेणा हल्ल्यात दहे बंधू गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी दुस-या शहरात रवाना करण्यात आले आहे. या घटनेमुळे मानवत शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ गुरूवार, दि. ९ जुलै रोजी मानवत पोलीस निरीक्षकांना शहरातील नागरिकांनी निवेदन देत आरोपींवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. ८ जुलै रोजी सकाळी ११.१५ वाजण्याच्या सुमारास अभयसिंह दहे हे जुन्या बस स्टँडसमोरील सोमाणी हॉस्पिटलजवळून जात असताना गावगुंड बावरी याने मोटारसायकलने त्यांना कट मारला. यावरून वाद निर्माण करून बरसातसिंग याने तात्काळ आपल्या इतर साथीदारांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानंतर या टोळक्याने अभयसिंह आणि त्यांचे लहान भाऊ नगरसेवक अॅड. विक्रमसिंह दहे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या प्राणघातक हल्ल्यात दहे बंधू गंभीर जखमी झाले. त्यांना मानवत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून दुखापतीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना पुढील उपचारासाठी दुस-या शहरातील मोठ्या रुग्णालयात पाठविले आहे.
या घटनेच्या निषेधार्थ पोलिस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात बावरी आणि त्याचे साथीदार शहरात धारदार शस्त्रे घेऊन फिरतात. भरधाव वेगाने वाहने चालवून नागरिकांना त्रास देतात. यामुळे शहरातील व्यापारावरही विपरीत परिणाम झाल्याचे म्हटले आहे. शहरात सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर विनापरवाना दारू विक्रीचे अड्डे सुरू आहेत. याशिवाय बेकायदेशीर सावकारी (व्याजाने पैसे देणे) जोरात सुरू असून पैशांच्या मोबदल्यात नागरिकांची वाहने ताब्यात घेणे, जमिनी परस्पर स्वत:च्या नावावर करून घेण्याचे प्रकार सुरू असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी बारहाते हॉस्पिटल परिसर आणि इतर चौकांमध्ये अशा घटना घडल्या असून नगरपालिकेच्या सीसीटीव्ही कॅमे-यात याचे पुरावे मिळतील असे निवेदनात नमूद केले आहे.
यापूर्वी १५ जून रोजी प्रा. अनंत गोलाईत (गहिलोत) यांनीही याच संदर्भात पोलिसांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती. मात्र, ठोस कारवाई न झाल्याने गुंडांचे मनोबल वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. संबंधित गावगुंडांवर तात्काळ मोक्का किंवा कडक कायदेशीर कारवाई करून मानवत शहर भयमुक्त करावे, अशी मागणी संजय नाईक, शंकर कच्छवे, राजेश कच्छवे, रघुवीर लाड, सार्थक दहे, सतीश चव्हाण, मोहन दहे, आकाश दहे यांच्यासह नागरिकांनी केली आहे. पोलिसांनी तातडीने पावले न उचलल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
















