29.4 C
Latur
Monday, May 13, 2024
Homeलातूरपावणेदोन कोटी महिलांचा लालपरीतून प्रवास

पावणेदोन कोटी महिलांचा लालपरीतून प्रवास

लातूर : योगिराज पिसाळ
महिला सन्मान योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाडयात महिलांना ५० टक्के सवलत लागू करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात लातूर जिल्ह्यातील १ कोटी ७४ लाख ४९ हजार २९५ महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. एसटी बसने प्रवास करणा-या महिलांच्या संख्येत मोठया प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

महिला सन्मान योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या साधी बस, मिनी बस, निमआराम बस, विनावातानुकूलित शयन-आसनी बस, शिवशाही, शिवनेरी, शिवाई आणि इतर सर्व बसमधून प्रवास करणा-या महिलांना प्रवास भाडयात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत या सवलती मधून महिलांना प्रवास करता येत आहे. तसेच ७५ वर्षांवरील नागरिकांसाठी यापूर्वीच ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेंतर्गत प्रवास भाड्यात शंभर टक्के सवलत देण्यात आली आहे. तसेच ५ ते १२ वर्षे वयोगटातील मुला-मुलींनाही ५० टक्के सवलत लागू आहे. आता उर्वरित सर्व वयोगटातील महिलांना ‘महिला सन्मान योजना’ अंतर्गत प्रवास भाडयात ५० टक्के सवलत लागू आहे.

लातूर जिल्हयात महिला सन्मान योजनेची सुरूवात १७ मार्चपासून सुरु झाली आहे. १६ मार्च पर्यंत म्हणजेच वर्षभरात जिल्ह्यातील १ कोटी ७४ लाख ४९ हजार २९५ महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यामध्ये लातूर आगार अंतर्गत ३९ लाख ६९ हजार २९७, उदगीर आगार अंतर्गत ३९ लाख ९४ हजार १८८, अहमदपूर आगार अंतर्गत ३३ लाख ९ हजार ६३३. निलंगा आगार अंतर्गत ३६ लाख ४८ हजार ६४, तर औसा आगार अंतर्गत २५ लाख २८हजार ११३ महिलांनी महिला सन्मान योजनेच्या ५० टक्के सवलतीचा लाभ घेतला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR