लातूर : प्रतिनिधी
जुलै महिण्याचा पहिला आठवडा संपत आला तरी लातूर जिल्हयात अद्याप पेरणी योग्य दमदार पाऊस झाला नाही. शिरूर अनंतपाळ तालुका वगळता इतर तालुक्यात पेरणी योग्य पाऊस पडलेल्या क्षेत्रावर शेतक-यांनी खरीपाच्या पेरण्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे जिल्हयात आजपर्यंत ९.१० टक्के म्हणजेच ५३ हजार ३२८ हेक्टरवर खरीपाची पेरणी झाल्या आहेत. जिल्हयात खरीपाच्या पेरण्या होण्यासाठी दमदार पावसाची शेतक-यांना प्रतिक्षा आहे.
जून महिना संपून जुलै महिण्याचा पहिला आठवडा संपत आला आहे. तरीही यावर्षी जिल्हयात मान्सूनचा दमदार पाऊस झाली नाही. जिल्हयात जळकोट तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. तर इतर तालुक्यात पेरणी योग्य पाऊस अद्याप न झाल्याने त्या परिसरातील शेतक-यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. जिल्हयात आज पर्यंत १०५.९ मिली मिटर पाऊसाची नोंद झाली आहे. त्यानुसार ५३ हजार ३२८ हेक्टरवर पेरा झाला आहे. यात ३७ हजार ७०३ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. ७ हजार ९९० हेक्टरवर तूर, ८६१ हेक्टरवर मूग, ५७० हेक्टरवर उडीद, १६४ हेक्टरवर ज्वारी, १८ हेक्टरवर मका, तीळाची ८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर कापसाची ६ हजार ७ हेक्टरवर लागवड झाली आहे.
जिल्ह्यात ९.१० टक्के झाल्या पेरण्या
यावर्षी जिल्हयात ५ लाख ९५ हजार ५८३ हेक्टर क्षेत्रावर खरीपाचा पेरा होण्याची शक्यता आहे. जिल्हयात आजपर्यंत ९.१० टक्के ५३ हजार ३२८ हेक्टरवर पेरा झाला आहे. यात जळकोट तालुक्यात ६९.४८ टक्के क्षेत्रावर पेरा झाला आहे. तर उदगीर तालुक्यात १७.१७ टक्के, अहमदपूर तालुक्यात २०.३८, रेणापूर तालुक्यात ५.६७ टक्के, निलंगा तालुक्यात१.०६ टक्के, देवणी तालुक्यात १.८७ टक्के, औसा तालुक्यात ०.५५ टक्के, लातूर तालुक्यात ३.४६ टक्के, चाकूर तालुक्यात २.०३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्यात अद्याप पेरणी झाली नाही.















