लातूर : प्रतिनिधी
मानव तस्करीसारख्या गंभीर सामाजिक गुन्ह्याला प्रतिबंध करण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस दलाने जनजागृतीला विशेष प्राधान्य देत जिल्हाभरात व्यापक मोहीम राबविली. जागतिक मानव तस्करीविरोधी दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील सर्व २३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांमध्ये मानव तस्करीविरोधी जनजागृती करण्यात आली.
या अभियानांतर्गत पोलीस अधिकारी व अंमलदारांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मानव तस्करी, बालकांचे अपहरण, बालमजुरी, महिला व मुलींचे शोषण, फसवणूक तसेच सोशल मीडिया आणि ऑनलाइन माध्यमातून होणारे गैरप्रकार याबाबत माहिती दिली. अनोळखी व्यक्तींकडून मिळणारी नोकरी, शिक्षण, पैशांची अथवा इतर आकर्षक आमिषे स्वीकारण्यापूर्वी योग्य पडताळणी करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. विशेषत: मुला-मुलींना फसवून परराज्यात अथवा परदेशात नेणे, बालकांना बेकायदेशीर कामासाठी लावणे किंवा महिलांना व मुलींना अनैतिक व्यवसायात ढकलणे यासारख्या प्रकारांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांना कोणतीही संशयास्पद व्यक्ती, हालचाल किंवा बालकाच्या सुरक्षिततेला धोका आढळल्यास पालक, शिक्षक किंवा पोलिसांना तात्काळ माहिती देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयातील अवैध मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष मार्फत मानव तस्करीविरोधात प्रतिबंधात्मक उपाययोजना, जनजागृती तसेच कायदेशीर कारवाई सातत्याने करण्यात येत आहे. पीडित महिला व मुलींची सुटका, बेपत्ता व अपहृत बालकांचा शोध, बालमजुरीस प्रतिबंध तसेच अवैध मानवी व्यापाराशी संबंधित व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे काम या कक्षामार्फत केले जाते.
या विभागा मार्फत लातूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात चालणा-या अनैतिक व्यापारास प्रभावीपणे आळा घालण्यासाठी अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ प्रमाणे कार्यवाही करण्यात येत असून सदर कक्षामध्ये एक पोलीस उप अधीक्षक, एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस अंमलदार, दोन महिला अंमलदार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष स्थापन झाले पासून कक्षाने अपहरणाचे (८० गुन्हे) उघड केले आहेत तर अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ अन्वये (२२) छापे मारून संबंधित पोलीस स्टेशन ला गुन्हे दाखल करून (४७) पीडित महिलांची सुटका करण्यात अली.
या अभियानातून ‘जागरूक विद्यार्थी, सुरक्षित समाज’ हा संदेश देण्यात आला. मानव तस्करी रोखण्यासाठी केवळ पोलिसांची कारवाई पुरेशी नसून पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांनीही सतर्क राहणे आवश्यक आहे, असे आवाहन लातूर पोलिसांनी केले.
‘एक जागरूक नागरिक एका बालकाचे आयुष्य वाचवू शकतो’’ या भावनेतून नागरिकांनी संशयास्पद प्रकारांची माहिती पोलिसांना देऊन मानव तस्करीविरोधी लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. ही जनजागृती मोहीम पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या नोडल अधिकारी डॉ. भगीरथी पवार, पोलीस उपअधीक्षक, सहा. पोलीस निरीक्षक अजिनाथ पाटील तसेच जिल्ह्यातील सर्व २३ पोलीस ठाण्यांचे अधिकारी व अंमलदार यांच्या सहभागातून राबविण्यात आली.
















