29.9 C
Latur
Tuesday, February 10, 2026
Homeमुख्य बातम्यादिल्लीत विषारी हवेचे दररोज २५ जण बळी

दिल्लीत विषारी हवेचे दररोज २५ जण बळी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्लीतील वाढते प्रदूषण आणि बदलती जीवनशैली यांचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. दिल्ली सरकारने जाहीर केलेल्या ताज्या अधिकृत आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये श्वसनाशी संबंधित आजारांमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या २०२३च्या तुलनेत वाढली आहे, तर हृदयविकार हे मृत्यूचे सर्वात मोठे कारण ठरले आहेत.

आकडेवारीचा सरासरी आढावा घेतल्यास, २०२४ मध्ये दिल्लीत श्वसनाशी संबंधित आजारांमुळे ९,२११ मृत्यू झाले. म्हणजेच, राजधानीत दररोज सुमारे २५ जणांचा मृत्यू श्वसनाशी संबंधित आजारांमुळे झाला, तर २०२३ मध्ये ८,८०१ मृत्यू झाले. म्हणजेच, एका वर्षात श्वसनविकारांमुळे मृत्यूंची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे.

तज्ज्ञांच्या मते, दमा, न्यूमोनिया, फुफ्फुसांचा कर्करोग आणि क्षयरोग (टीबी) हे प्रमुख कारणे आहेत. प्रदूषित हवा, धूळ-धूर, विषारी वायू आणि अस्वस्थ जीवनशैली यामुळे ही समस्या तीव्र होत आहे. चिंतेची बाब म्हणजे, हे आजार आता केवळ वृद्धांपुरते मर्यादित न राहता तरुण आणि लहान मुलांनाही प्रभावित करत आहेत.

२०२४ मध्ये परिसंचरण तंत्राशी संबंधित आजार हे दिल्लीतील मृत्यूचे सर्वात मोठे कारण ठरले. २०२४ मध्ये २१,२६२ मृत्यू झाले, तर २०२३ मध्ये १५,७१४ जणांचा यामुळे बळी गेला. एका वर्षात तब्बल ५,५०० हून अधिक मृत्यूंची वाढ नोंदवण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR