नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना संधी मिळूनही देशपातळीवर पंतप्रधानपदाला गवसणी घालता आली नाही. त्यामुळे दिल्लीच्या सत्ताकारणात मराठी माणसाचा प्रभाव कमी झाल्याची चर्चा अनेकदा होते. मात्र, राजकारणात प्रभाव कमी झाला असला तरी समाजकारण आणि आंदोलनांच्या माध्यमातून मराठी माणसाने पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली आहे.
गेल्या १५ वर्षांच्या काळात एकदा नव्हे तर दोनदा मराठी माणसाने दिल्लीचे राजकीय तख्त पार हादरवून सोडले. २०११ मध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या रूपाने तर आता नव्या दमाच्या अभिजीत दिपके या तरुणाच्या रूपाने मराठी माणसाचा आक्रमक बाणा संपूर्ण देशाने पाहिला. मराठी माणसाने आपल्या हिमतीच्या जोरावर अनेकदा दिल्लीचे तख्त राखले आहे. याचा इतिहास आहे. मात्र, प्रसंग आल्यास ते तख्त हादरवण्याची क्षमताही त्यांच्यात आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. २०११ साली अण्णा हजारे यांनी लोकपाल आणि भ्रष्टाचाराविरोधात छेडलेल्या आंदोलनाने तत्कालीन यूपीए सरकार पूर्णपणे हादरले होते. त्या आंदोलनातून देशात नवीन नेतृत्व उभे राहिले आणि २०१४ मध्ये सत्तांतर झाले.
आता २०२६ मध्ये अभिजित दिपके या तरुणाने सुरू केलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे थेट केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. मोदी सरकारच्या १२ वर्षांत अनेक मोठी आंदोलने झाली, मात्र एकाही आंदोलनामुळे मंर्त्याचा राजीनामा झाला नव्हता. हा ऐतिहासिक चमत्कार अभिजीत दिपकेच्या आंदोलनामुळे घडला.
अभिजित दिपके हा मूळ मराठवाड्यातील आहे. हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी हे त्याचे गाव आहे. वडिलांच्या नोकरीमुळे छत्रपती संभाजीनगर येथे शिक्षण व वास्तव्य राहिले. त्याने पुण्यातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले. त्यानंतर अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठातून पब्लिक रिलेशन्समध्ये एम.एस्सीपर्यंत शिक्षण घेतले. २०२० ते २०२२ दरम्यान आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया टीममध्ये प्रमुख स्वयंसेवक म्हणून त्याने काम पाहिले. २०२० च्या दिल्ली निवडणुकीतील अनेक प्रसिद्ध राजकीय मीम्सची संकल्पना त्याचीच होती.
कॉकरोच जनता पार्टीची स्थापना
कॉकरोच जनता पार्टी पक्षाच्या स्थापनेमागे सरन्यायाधीशांची एक टिप्पणी कारणीभूत ठरली. १५ मे २०२६ रोजी बोगस पदव्यांशी संबंधित एका सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी काही बेरोजगार लोक झुरळांसारखे (कॉकरोच) असतात, जे सोशल मीडिया आणि आरटीआयच्या माध्यमातून सरकारला ट्रोल करतात, अशी टिप्पणी केली होती. या वक्तव्याला उपरोधिक उत्तर देण्यासाठी १६ मे रोजी अभिजीत दिपकेने कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली. सोशल मीडियावर पक्षाचे सदस्यत्व जाहीर करताच काही दिवसांतच सीजेपीचे फॉलोअर्स भाजप-काँग्रेससारख्या बड्या पक्षांपेक्षाही अधिक झाले.
जंतर-मंतर ते
संसदेवरील धडक
नीट पेपरफुटी प्रकरणी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत २८ जून रोजी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने जंतरमंतरवर उपोषण सुरू केले. २० व्या दिवशी म्हणजे १८ जुलै रोजी पोलिसांनी वांगचुक यांचे उपोषण जबरदस्तीने मोडून त्यांना रुग्णालयात हलवले. यानंतर अभिजीत दिपकेने आंदोलनाची सूत्रे हाती घेत २० जुलै रोजी संसदेवर मोर्चाची हाक दिली. त्यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे आंदोलन अधिक चिघळले. त्यावरून तरुणाईने सोशल मीडियाच्या प्रभावी वापराने मुंबई, पुणे, पाटण्यासह देशभर आंदोलनाची आग पसरवली. त्यामुळे अखेर सरकारला एक पाऊल मागे घ्यावे लागले. त्यातूनच धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यामागे अभिजित दिपके या मराठी माणसाचा प्रमुख वाटा आहे.
















