जळकोट : प्रतिनिधी
लातूर रोड जळकोट बोधन हा रेल्वेमार्ग सन २०१६ यावर्षी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मंजूर केला होता. येत्या ४ ते ५ महिन्यांनी २०२७ उजाडणार आहे. या रेल्वे मार्गास मंजूर होऊन तब्बल दहा वर्षे झाले आहेत. केंद्र सरकारकडून आवश्यक बाबी पूर्ण झालेल्या आहेत मात्र राज्य सरकार या रेल्वे मार्गासाठी आपला वाटा उचलत नसल्यामुळे या रेल्वेमार्गाचे काम रखडले आहे. सध्या मुंबई येथे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. या अधिवेशनात आमदार संजय बनसोडे या रेल्वेमार्गाचा मुद्दा उपस्थित करतील व या रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून आणतील अशी अपेक्षा जळकोट तालुक्यातील जनतेस आहे .
जळकोट शहराच्या अगदी जवळून जाणा-या लातूर रोड ते बोधन हा रेल्वे मार्ग केंद्र शासनाच्या यादीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण रेल्वे मार्ग म्हणून नोंद आहे. हा रेल्वे मार्ग दक्षिण मध्य रेल्वेच्या आखत्यारीत येतो . या रेल्वे मार्गाचे अंतिम लोकेशन सर्वे हा पूर्ण झालेला आहे . या रेल्वे मार्गाचा मार्गही निश्चीत झाला आहे. लातूर रोड-जळकोट -मुखेड – बोधन हा रेल्वेमार्ग अतिशय महत्त्वाचा आहे. थेट कोकण ते विशाखापटनम ही दोन बंदरे एकमेकांना जोडली जाणार आहेत. निजामाच्या काळातही या रेल्वेमार्गाचा सर्वे झाला होता परंतु हे काम पूर्ण होऊ शकले नव्हते , यानंतर या रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठी पाठपुरावा सुरूच असल्यामुळे, हा रेल्वे मार्ग २०१६ साली मंजूर झाला . याच्या सर्वेक्षणासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. या रेल्वेमार्गासाठी साधारणपणे २५०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे .
पहिल्या टप्प्यात केलेल्या सर्वेक्षणामध्ये हा रेल्वेमार्ग १३४ किलोमीटर लांबीचा होणार आहे यासाठी २४०९ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने हा सर्वे करण्यात आला आहे. बोधन येथून मुखेड, जळकोट मार्गे पुढे चाकूर जवळ हा रेल्वे मार्ग जोडला जाणार आहे .लातूर रोड जळकोट बोधन या रेल्वे मार्गासाठी ७३२ हेक्टर जमीन लागणार आहे. या मार्गावर जवळपास ९३ पुल होणार आहेत. यातील पंधरा पूल हे मोठे आहे तर ७८ पुल छोटे आहेत. या रेल्वेमार्गाचा एका किलोमीटरसाठी १७ कोटी ९१ लाख रुपयांचा निधी लागणार आहे. हा सर्व आराखडा तयार करण्यात आला आहे .
या रेल्वे मार्गाचे काम आतापर्यंत सुरू झाले असते परंतु राज्य सरकारकडून या रेल्वेमार्गासाठी अर्धा वाटा उचललेला नाही. जोपर्यंत राज्य सरकार या रेल्वेमार्गासाठी निधी उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत या रेल्वेमार्गाचे काम सुरू होणार नाही . केवळ राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे हा रेल्वे मार्ग रखडलेला आहे. राज्य सरकारने याकडे लक्ष दिल्यास लागलीच जमिनीचे भूसंपादन प्रक्रिया सुरू होऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे मात्र या रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा कमी पडत आहे .लातूर रोड जळकोट बोधन रेल्वे मार्गानंतर अनेक रेल्वे मार्ग मंजूर झाले या रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने आपला वाटा दिलेला आहे .
उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांनी या रेल्वे मार्गाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. राज्य सरकारकडे पाठपुरावा करून या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करून यासाठी निधी उपलब्ध करून घेणे गरजेचे आहे. असेच राज्य सरकार दुर्लक्ष करीत राहिल्यास हा रेल्वे मार्ग कधीही पूर्ण होऊ शकणार नाही. यामुळे आता या भागाचा आमदार म्हणून संजय बनसोडे यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी जळकोट तालुक्यातील नागरिकाकडून केली जात आहे.
















