प श्चिम आशियातील संघर्षामुळे उद्भवलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी नागरिकांनी काटकसरीचे उपाय योजावेत, असे आवाहन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभर सोने खरेदी न करण्याबाबतचे वक्तव्य केले होते. त्यावर देशभरातून तीव्र पडसाद उमटले आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांचे विधान म्हणजे त्यांच्या अपयशाचा पुरावा असल्याचे म्हटले आहे. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी सोमवारी मोदींवर जोरदार टीका करताना ‘तडजोड केलेले पंतप्रधान आता देश चालवण्यास सक्षम राहिलेले नाहीत’, असे म्हणत सरकारवर जोरदार निशाणा साधला. सोन्याशी संबंधित सुमारे तीन कोटी कामगारांचे काय होणार, असा सवाल सराफा बाजाराने उपस्थित केला. मोदी यांनी वर्षभर सोने खरेदी करू नका, असे आवाहन केले आहे. या आवाहनाला सराफा व्यापारी विरोध करताना दिसत आहेत. तीन कोटी कामगारांचे काय होणार, असा सवाल केला जात आहे. मोदींच्या सोने खरेदी न करण्याच्या आवाहनानंतर सराफा बाजारात लोकांची गर्दी कमी झाली आहे. सोन्याचे भावही घसरले आहेत. या घडामोडीवर सराफा व्यापा-यांनी संताप व्यक्त करत मोदींच्या आवाहनाला विरोध केला.
आपल्या १२ वर्षांच्या अपयशाचे खापर भारतीय जनतेच्या डोक्यावर फोडू नका, असा इशारा विरोधी पक्षाने पंतप्रधानांना दिला. पंतप्रधानांचे विधान म्हणजे त्यांच्या अपयशाचा पुरावा असल्याची टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली. ‘एक्स’वरील आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, मोदीजींनी जनतेला त्याग करण्याचे आवाहन केले. सोने खरेदी करू नका, परदेश प्रवास टाळा, पेट्रोेलचा वापर कमी करा, खते आणि खाद्य तेलाचा वापर कमी करा, मेट्रोने प्रवास करा आणि ‘वर्क फ्रॉम होम’करा, हे केवळ सल्ले नसून सरकार आपटल्याचे पुरावे आहेत. ते पुढे म्हणतात, १२ वर्षांच्या काळात देशाला अशा टप्प्यावर आणून ठेवले आहे की, आता जनतेला काय खरेदी करावे आणि काय नाही, कुठे जावे आणि कुठे नाही हे सांगावे लागत आहे. आपली जबाबदारी झटकण्यासाठी ते वारंवार जनतेवर भार टाकत आहेत. निवडणुका संपताच सरकारला ‘संकटा’ची आठवण झाली. भाजप सरकारचे अर्थव्यवस्था आणि परराष्ट्र धोरणावरील नियंत्रण सुटले आहे, अशी टीका सपाचे नेते अखिलेश यादव यांनी केली आहे. हे सरकार केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून कारभार करते, अशी कोपरखळी ठाकरे शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांनी मारली. जर इंधन वाचवायचे असेल तर पंतप्रधानांनी स्वत:चे रोड शो, जाहीर सभा आणि परदेश दौरे थांबवावेत, अशी टीका ‘आप’चे संजय सिंह यांनी केली.
सामान्य जनतेकडे खायला पैसे नाहीत मग ते सोने कोठून खरेदी करणार, मोदी कोणाला सल्ला देत आहेत? असा सवाल सीपीआयचे डी. राजा यांनी केला. काँग्रेससमवेत अन्य विरोधी पक्षनेत्यांनी मोदींवर टीका केली असताना भारतीय जनता पक्षाने पंतप्रधानांच्या विधानाचा बचाव केला असून हे आवाहन व्यापक राष्ट्रहितासाठी असल्याचे म्हटले आहे. कठीण काळात काँग्रेसचे केवळ राजकारण सुरू असते. त्यांना राष्ट्रउभारणीशी काही देणे-घेणे नाही, अशी टीकाही भाजपने केली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही तीव्र शब्दांत टीका केली. जेव्हा लोक अडचणीत आहेत तेव्हा पंतप्रधान बचतीचे धडे देत आहेत. २८ फेब्रुवारीला जेव्हा पश्चिम आशियात संघर्ष सुरू झाला, तेव्हाच काँग्रेसने अर्थव्यवस्थेवरील परिणामांबाबत इशारा दिला होता. मात्र तेव्हा पंतप्रधान प्रचारात आणि ‘रोड शो’मध्ये व्यस्त होते. निवडणुका संपताच आता जनतेला ‘हे करू नका, ते करू नका’, अशी प्रवचने ऐकवली जात आहेत, असा टोला खरगे यांनी लगावला.
सोने खरेदी न करण्याच्या आवाहनानंतर सोन्याचा भाव घसरला आहे. सध्या लग्नसराई आहे. तरीही दागिन्यांच्या दुकानात गर्दी दिसत नाही. ज्वेलरी मेकिंगवर उदरनिर्वाह असणा-या ३ कोटी कारागिरांचे काय होणार, असा सवाल ऑल इंडिया ज्वेलर्स संघटनेने केला आहे. भारतात दागिन्यांच्या घडणावळीचे काम करणारे तीन कोटी कारागीर आहेत. ते काम कोठे करणार? मुंबईत एकूण १५ हजार ज्वेलर्स आहेत, त्यांचे काय होणार? देशभक्त आम्ही पण आहोत, पण कोणाची रोजीरोटी जायला नको, असे आमचे मत आहे, असे संघटनेने म्हटले आहे. वर्षभर सोने विकले नाही तरीही सोन्याचे व्यापारी जगू शकतात, मात्र कारागिरांनी कसे जगायचे? पंतप्रधानांनी जनतेला काटकसरीचे आवाहन केले. निवडणुका संपल्याने आता जनतेसाठी महागाईचा काळ कठीण असेल. पेट्रोल, डिझेलचा वापर कमी करण्याचे आवाहन करताना त्याची सुरुवात श्रीमंत आणि राजकारण्यांपासून व्हायला हवी. धनदांडगे स्वत:च्या विमानाने, गाड्यांनी फिरणार असतील तर सामान्यांनीच का विचार करावा? सोने खरेदी टाळण्याचे आवाहनही केवळ सामान्यांसाठीच का? ‘वर्क फ्रॉम होम’सारखे निर्णय सरकारने आदेशाद्वारे लागू करावेत.
केवळ आवाहने करून उपयोग नाही. तेल-इंधन कमी वापरा असे मोदी सांगत आहेत. त्याऐवजी त्यांनी देशात पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय करावी, अन्यथा भविष्यात ‘पाणी कमी प्या’ असे आवाहन करण्याची वेळ येईल. सामान्य नागरिकांनीच केवळ काटकसर करावी ही अपेक्षा चुकीची आहे. लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांनीही सरकारी जाहिराती, भव्य स्वागत समारंभ आणि अनावश्यक दौरे टाळून आदर्श घालून दिला पाहिजे. सर्वप्रथम भाजपशासित राज्यांनी स्वत:हून काटकसर करावी मगच जनतेला आवाहन करावे, ही अपेक्षा योग्यच आहे. मोदी यांनी सलग दुस-या दिवशी वडोदरा येथे देशवासियांना इंधन जपून वापरण्याचे आवाहन केले. पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, मेट्रो, विजेच्या बस सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करावा असे ते म्हणाले. ‘वर्क फ्रॉम होम’, शाळा ऑनलाईन चालवणे आदी उपाययोजना कराव्यात. कोरोनाचा मुकाबला देशाने केला. त्याचप्रमाणे भारतीयांनी सध्याच्या संकटाचा सामना करावा. परदेशात राहणा-या भारतीयांनी किमान ५ परदेशी पाहुण्यांना भारतात पर्यटनासाठी आणावे असे आवाहन त्यांनी केले. निवडणुका होईपर्यंत झोपलेल्या सरकारला आता इंधनाची आठवण झाली आहे. युध्दस्थितीवर कोणतीही प्र्रतिक्रिया न देता केवळ प्रचारात मग्न असणारे सत्ताधारी आता जनतेला काटकसरीचे डोस पाजत आहेत.
स्वत:ला स्वच्छ म्हणवणारा भाजप सत्तेसाठी कोणत्याही थराला जातो हे जनतेने पाहिले आहे. ज्या राज्यात ताकद नाही, तिथे मित्र पक्षांचे खच्चीकरण करणे हा भाजपचा इतिहास आहे. केरळ आणि तामिळनाडूमध्ये भाजपचे अस्तित्वच नसल्याने ही राज्ये वगळता अन्य राज्यांमध्ये आपला कुटील डाव खेळून भाजपने आपली राजकीय पोळी भाजून घेतली आहे. तपास यंत्रणांचा धाक, दांभिकपणा, रेवडी बाजार, विद्वेष, दुष्प्रचार, पैशाच्या प्रलोभनाद्वारे मतदारांना विकतही घेतले गेले. सामान्य माणूस हा परिस्थितीनुसारच कोठे, किती खर्च करावा याचा अंदाज घेऊनच निर्णय घेत असतो. मग तो परदेश दौरा असो किंवा सोने-चांदी खरेदी असो. पंतप्रधानांनी जनतेला उपदेशाचे डोस पाजताना, स्वत: परदेश दौरे कमी करायला हवेत. मेट्रो, समृध्दी महामार्ग, मिसिंग लिंक, बोरिवली-ठाणे भुयारी मार्ग, लाडकी बहीण योजना यावर पाण्यासारखा पैसा खर्च करून देशाला दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभे केले आहे त्याचे काय?

