पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारताचे परराष्ट्र आणि सुरक्षा धोरण अत्यंत कणखर बनले आहे. यात राष्ट्रीय सल्लागार अजित डोवाल यांच्या धोरणात्मक निर्णयांचा सगळ्यात मोठा वाटा आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काढले. अजित डोवाल यांना पुण्यात आयोजित सोहळ्यात लोकमान्य टिळक ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शहा म्हणाले की, डोवाल हे भारताचे आजवरचे सर्वाधिक काळ सेवा बजावणारे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ठरले असून भारतीय सैन्याचे आधुनिकीकरण करणे, लष्करामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे आणि कठीण प्रसंगात कठोर निर्णय घेणे यात त्यांचा अनुभव नेहमीच मोलाचा ठरला आहे.
डोवाल यांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे केवळ अहमदाबादमधीलच नव्हे, तर देशभरातील १३ बॉम्बस्फोटांच्या प्रकरणांचा एकाच वेळी उलगडा करण्यात गुजरात पोलिसांना यश आले होते. आयपीएस अधिकारी असलेले अजित डोवाल यांनी आपल्या सेवेच्या सुरुवातीलाच केरळ केडर सोडून गुप्तचर विभागात दाखल होण्याचा अत्यंत धाडसी निर्णय घेतला होता. पाकिस्तानात सलग सहा वर्षे अत्यंत गुप्तपणे वास्तव्य करून त्यांनी भारतासाठी जी महत्त्वाची माहिती गोळा केली, ती देशाच्या सुरक्षेसाठी ऐतिहासिक ठरली. देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा मजबूत कणा मानल्या जाणा-या ‘मल्टी एजन्सी सेंटर’ या संस्थेची स्थापना डोवाल यांनीच केली होती. जी आज देखील देशाच्या गुप्तचर यंत्रणेत कळीची भूमिका बजावत आहे. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यलढ्याला जनआंदोलनाचे स्वरूप देत सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक राष्ट्रवादाची भावना जनमानसात रुजवली.
या माध्यमातून त्यांनी देशभक्त नागरिक घडवण्याचे ऐतिहासिक कार्य करण्याबरोबरच देश चालवण्याची दिशादेखील दिली. आजच्या युवकांनी लोकमान्यांचे ‘गीतारहस्य’ अवश्य वाचावे. हा ग्रंथ वाचल्यास चुका होणार नाहीत असा सल्ला अमित शहा यांनी ‘जेन झी’पिढीला दिला. लोकमान्यांनी आंदोलनांच्या माध्यमातून जनतेला जोडून ठेवण्याचे काम केले. भगवद्गीतेचे व्यावहारिक जीवनातील महत्त्व टिळकांनी ज्या पद्धतीने स्पष्ट केले, त्यातून प्रत्येक नागरिकाला जीवनाची दिशा मिळू शकते. त्यामुळे तरुणांनी त्याचे वाचन केले पाहिजे, असा सल्ला अमित शहा यांनी दिला. पुरस्कार सोहळ्यात सत्काराला उत्तर देताना अजित डोवाल म्हणाले, युवकांनी लोकमान्य टिळकांचे विचार आणि ‘गीतारहस्य’चा अभ्यास करून समर्पण, त्याग आणि कर्तव्यभावनेने विकसित भारताच्या उभारणीत सहभागी व्हावे. स्वातंत्र्य ही सहज मिळालेली देणगी नसून असंख्य स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग आणि बलिदानातून प्राप्त झालेली अमूल्य संपत्ती आहे. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ हा संदेश आजच्या काळात विकसित भारताच्या राष्ट्रीय संकल्पात रुपांतरित करण्याची गरज आहे. तरुण पिढीला उद्देशून डोवाल म्हणाले, मनमानी म्हणजे स्वातंत्र्य नव्हे. आजचा दिवस अत्यंत विशेष आहे.
स्वातंत्र्यसंग्रामाचे प्रेरक, अद्भूत सेनानी, विचारवंत आणि मार्गदर्शक लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आहे. युवकांनी लोकमान्यांची राष्ट्रउभारणीची परिकल्पना काय होती, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आजच्या तरुणांना वाटते की, स्वातंत्र्य म्हणजे केवळ स्वत:च्या इच्छेने किंवा मनात येईल ते करणे. पण स्वातंत्र्य म्हणजे एवढेच नाही. ज्या काळी इंग्रजांविरुद्ध आवाज उठवण्याचे धैर्य कोणामध्येही नव्हते, समाजात वेदना आणि अत्याचार होते, त्या काळी लोकमान्य टिळकांनी संघर्षाचा कठीण मार्ग स्वीकारत देशाचे नेतृत्व केले. लोकमान्य टिळक पुरस्कार आतापर्यंत अनेक महनीय व्यक्तींना प्रदान करण्यात आला. यंदा राष्ट्रीय सुरक्षेला नवी दिशा देणा-या, राष्ट्राकरिता जीवन समर्पित केलेल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना हा पुरस्कार देण्यात आला. एका धुरंधराला पुरस्कार देण्यासाठी दुसरे धुरंधर आज कार्यक्रमाला आलेले आहेत. एक राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रातील चाणक्य, तर दुसरे राजकीय क्षेत्रातील चाणक्य असा दुग्धशर्करा योग जुळून आल्याचे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमात बोलताना काढले. डोवाल यांनी आपल्या भाषणात देशासमोरील अंतर्गत आणि बा आव्हानांचा उल्लेख केला. त्या संदर्भात युवकांना सावध राहण्याचा सल्ला देताना ते म्हणाले.
रणनीती, विकास आणि राष्ट्रीय सुरक्षा याबाबत विचार करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे, ज्या मार्गामुळे देशाचे नुकसान होईल, तो मार्ग कधीही स्वीकारू नका. राष्ट्रहितात जे नाही ते अखेरीस आपल्या हिताचेही नसते. आजही देशासमोर अनेक अंतर्गत आणि बा आव्हाने आहेत. अशावेळी एकजूट ठेवून देशासाठी काम करण्याची गरज आहे. देशाला जगातील सर्वांत शक्तिशाली राष्ट्र बनवण्याची क्षमता आपल्या युवकांमध्ये आहे. पंतप्रधान मोदी, अमित शहा यांचा उल्लेख करताना ते म्हणाले, देशाला पुढे नेण्याची त्यांची तळमळ आणि राष्ट्राप्रती असलेले समर्पण मी जवळून पाहिले आहे. देशहितासाठी घेतलेले निर्णय भारताला अधिक सक्षम बनवतील असे मत त्यांनी व्यक्त केले. जंतरमंतरवरील घटनेनंतर गृहमंत्री अमित शहा प्रथमच पुण्यात येत होते. काँग्रेसने त्यांच्या विरोधात निदर्शने करण्याचा इशारा दिला होता. पोलिसांनी काही काँग्रेस कार्यकर्त्यांची आधीच धरपकड केली होती. अखेर कोणतीही अप्रिय घटना न घडता पुरस्कार कार्यक्रम व्यवस्थित पार पडला ही समाधानाची बाब.
















