Homeमुख्य बातम्याआठवड्यात ६ तर, वर्षभरात ५४ वाघांचा मध्यप्रदेशात बळी

आठवड्यात ६ तर, वर्षभरात ५४ वाघांचा मध्यप्रदेशात बळी

भोपाळ : वृत्तसंस्था
‘टायगर स्टेट’ म्हणून ओळखल्या जाणा-या मध्य प्रदेशमध्ये वाघांच्या मृत्यूंचा धक्कादायक आकडा समोर आला आहे. २०२५ मध्ये आतापर्यंत (१३ डिसेंबरपर्यंत) तब्बल ५४ बाघांचा मृत्यू झाला असून, १९७३ मध्ये प्रोजेक्ट टायगरची सुरुवात झाल्यानंतर एका वर्षातील हा सर्वाधिक आकडा आहे. गेल्या एका आठवड्यातच राज्यात ६ वाघांचे मृत्यू झाल्याने वन्यजीव संरक्षणावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या ५४ वाघांच्या मृत्यूपैकी तब्बल ३६ मृत्यू रहस्यमय असल्याचे समोर आले आहे. अनेक प्रकरणांमध्ये वाघांची शिकार झाल्याचा संशय आहे. काही घटनांमध्ये वाघांचे पंजे कापून तस्करांनी नेल्याचेही आढळल्याने चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय तस्कर बाजारात एका वाघाची किंमत सुमारे १ ते ३ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

वाघाच्या मृत्यूची ताजी घटना बांधवगड व्याघ्र प्रकल्पातील आहे. उमरिया जिल्ह्यातील चंदिया वनपरिक्षेत्रातील कथली नदीच्या काठावर एका वाघाचा मृतदेह आढळला. संशयास्पद परिस्थितीत मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून, चौकशी सुरू आहे. वन कर्मचारी नियमित गस्त आणि जनगणना करत असताना ही घटना उघडकीस आली.

राजकीय आरोप-प्रत्यारोप
वाघांच्या सुरक्षेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. काँग्रेसने मध्य प्रदेश सरकारवर अपयशाचा ठपका ठेवला आहे. काँग्रेस प्रवक्ते अभिनव बारोलिया यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. दरम्यान, वन राज्यमंत्री दिलीप सिंह अहरवार यांनी वन विभाग सर्व प्रकरणांची गंभीरतेने चौकशी करत असल्याचे सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR