मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील प्रत्येक वाहनावर ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’असणे बंधनकारक असून, जुन्या वाहनांवर ही नंबर प्लेट बसवून घेण्यासाठी वाहनधारकांना ३१ डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. मुदतीनंतर एचएसआरपी नंबर प्लेट न लावलेल्या वाहनांवर कठोर कारवाई होणार असल्याचे सांगितले आहे.
परिवहन विभागाच्या आणि पोलिसांच्या निदर्शनास आले आहे की, गुन्हेगारी घटनांमध्ये साध्या किंवा बनावट नंबर प्लेट असलेल्या वाहनांचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला जातो. गुन्हेगारांचा शोध घेण्यात पोलिसांना मोठी डोकेदुखी ठरते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने राज्यातील प्रत्येक वाहनावर एचएसआरपी नंबर प्लेट असण्याचा निर्णय परिवहन भागाने घेतला आहे.
राज्यातील जुन्या वाहनांपैकी आतापर्यंत सुमारे १ कोटी वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यात आली आहे. उर्वरित ४४ ते ४५ टक्के जुन्या वाहनधारकांनी ३१ डिसेंबरपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
नियमातून कोणालाही सूट नाही
प्रताप सरनाईक यांनी लोकप्रतिनिधींनाही नियमांची स्पष्ट जाणीव करून दिली आहे. या नियमातून कोणालाही सूट दिली जाणार नाही. मंत्री, खासदार, आमदार किंवा इतर कोणतेही लोकप्रतिनिधी असोत, सर्वांसाठी एचएसआरपी नंबर प्लेट बंधनकारक आहे. ३१ डिसेंबरनंतर ज्या पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधींच्या वाहनांवरही नियमांनुसार समान कारवाई करण्यात येईल, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी तीन वेळा मुदतवाढ
पहिली मुदतवाढ : ३० एप्रिल २०२५
दुसरी मुदतवाढ : १५ ऑगस्ट २०२५
तिसरी मुदतवाढ : ३० नोव्हेंबर २०२५
आता ३१ डिसेंबर ही मुदत देण्यात आली असली, तरी अजूनही नंबर प्लेट न बसवलेल्या वाहनांची संख्या मोठी आहे. या सर्व वाहनांवर एकाच वेळी कारवाई करणे प्रशासनाला शक्य होईल का, आणि नागरिकांचा संभाव्य रोष पाहता सरकार पुन्हा एकदा मुदतवाढ देणार का? याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.
















