परभणी : भारतीय हवामान विभाग मुंबई यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार परभणी जिल्ह्यासाठी दि.३० जुलै रोजी वादळी वारे, विजांचा कडकडाट व अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभुमीवर नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या रेड अलर्टच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी विशेष सतर्कता व खबरदारी बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडणे व प्रवास करणे टाळावे. नदी, नाले, ओढे, पूल, बंधारे तसेच सखल व पूरप्रवण भागात जाणे टाळावे. पाण्याचा प्रवाह असलेल्या रस्त्यावरून अथवा पुलावरून वाहन नेण्याचा प्रयत्न करू नये. विजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली, विद्युत खांबाजवळ किंवा मोकळ्या जागेत थांबू नये. नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत अचानक वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणा-या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा असे आवाहन करण्यात आले आहे.
आपल्या परिसरात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, दूरध्वनी क्र. ०२४५२-२२६४००, टोल फ्री क्र. १०७७ तसेच संपर्क अधिकारी पवन खांडके यांच्याशी मो. ९९७५०१३७२६ या क्रमांकांवर तात्काळ संपर्क साधावा. नागरिकांनी घाबरू नये सतर्क रहावे आणि प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.
















