जिंतूर : छत्रपती संभाजीनगर येथून वसमतकडे जाणारी बस जिंतूर-परभणी महामार्गावरील चांदज गावाजवळ गुरुवार, दि.३० जुलै रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास उलटली. या बसमध्ये तब्बल ५१ प्रवाशी होते. बस पलटी होताच प्रवाशांनी मदतीसाठी आरडाओरड करण्यास सुरूवात केली. या घटनेत बसमधील अनेक प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचार केल्यानंतर काहींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. दरम्यान या अपघातामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी वाहनांच्या रांगा लागल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर येथून वसमतकडे (एम.एमच. २० बीएल २२४०) ही बस निघाली होती. जिंतूर येथून पुढील प्रवासासाठी बस निघाली असताना जिंतूर-परभणी महामार्गावरील चांदज गावाजवळ बस रस्त्याच्या डाव्या बाजुला जावून उलटली. बस पलटी होताच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रवाशांचा आरडाओरडा ऐकून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तात्काळ बचावकार्य सुरू केले. या अपघातात अनेक प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या. जखमींना रुग्णवाहिकेद्वारे तातडीने जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी प्राथमिक उपचारानंतर काही जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच एस. टी. महामंडळाचे जिंतूर आगार प्रमुख गिलचे, विभागीय वाहतूक अधिकारी संदीप साळुंखे, लेखाकार पांचाळ, वाहतूक लिपिक गजानन घुगे, अतुल जैन यांनी घटनास्थळी भेट देवून बचाव कार्याचा आढावा घेतला. जखमी प्रवाशांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी त्यांनी आवश्यक ती व्यवस्था केली. या अपघातात बस चालक जी. एस. नागरगोजे, वाहक पी. एम. गोरे बचावले असून अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे. या अपघातामुळे काही काळ जिंतूर-परभणी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिस, स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे वाहतूक नंतर सुरळीत करण्यात आली. या अपघातात जीवितहानी टळल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.
















