महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा रंगू लागली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ला आता नवे आणि अंतिम वळण मिळाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाचे सहा ते सात खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असून त्यापैकी काहीजण दिल्लीला रवानाही झाले आहेत. या नव्या राजकीय भूकंपामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ठाकरे गटातील काही खासदार सध्या दिल्लीत असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण आले असून लवकरच महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संसद अधिवेशन आणि आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाकरेंचे फुटलेले खासदार हे लवकरच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्रही देण्याची शक्यता आहे. शिंदे गटात प्रवेश करण्याची चर्चा ज्या खासदारांबाबत सुरू आहे, त्यात ओमराजे निंबाळकर, संजय देशमुख, बंडू जाधव, नागेश आष्टीकर, संजय दीना पाटील आणि राजाभाऊ वाझे यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, या वृत्ताला अद्याप कोणत्याही संबंधित खासदारांकडून किंवा पक्षाकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याच्या उद्देशाने शिंदे गटाकडून विविध पातळ्यांवर आमदार व खासदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यालाच राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन टायगर’असे नाव देण्यात आले आहे.
ठाकरे गटातील नाराज नेते आणि लोकप्रतिनिधींना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. चर्चेत असलेल्या सहा ते सात खासदारांनी प्रत्यक्षात शिंदे गटात प्रवेश केला तर तो उद्धव ठाकरे यांच्या पक्षासाठी मोठा राजकीय धक्का मानला जाऊ शकतो. लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केल्यानंतर ठाकरे गटाने आपली ताकद सिद्ध केली होती. अशा परिस्थितीत खासदारांची संभाव्य गळती पक्षासाठी चिंतेचा विषय ठरू शकते. दिल्लीतील बैठका, वाढलेल्या राजकीय हालचाली आणि चर्चेत असलेली नावे यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाकरे गटाचे दिल्लीत दाखल झालेले सहा खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांना पत्र देणार असल्याचे बोलले जात आहे. या खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करू नये यासाठी ठाकरे गटाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र पाठवले आहे. ठाकरे शिवसेनेचे लोकसभा गटनेते अरविंद सावंत यांनी खासदारांना व्हिप बजावला आहे. तसेच लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पक्षाचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा कोणत्याही फुटीर गटाला किंवा स्वतंत्र गटाला मान्यता, दर्जा अथवा विशेषाधिकार देऊ नये.
ज्या राजकीय पक्षांकडून सदस्यांना जनादेश मिळाल्याचा दावा करता येतो त्यांना त्याच पक्षाच्या विरोधात कार्य करत गटांना मान्यता देण्याची कोणतीच तरतूद अस्तित्वात नाही. स्वतंत्र गटाच्या अशा कोणत्याही मागणीला संसदीय कार्यपद्धतीत आधार नाही. अरविंद सावंत यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा एकच राजकीय पक्ष आहे आणि कायद्याच्या दृष्टीनेही तो तसाच अस्तित्वात आहे. संसदीय गटाचे अस्तित्व पूर्णत: राजकीय पक्षावर अवलंबून असते. तो राजकीय पक्षाचा एक घटक म्हणून काम करत असतो. लोकसभेत ठाकरे पक्षाच्या स्वतंत्र गट किंवा फुटीर गटाला मान्यतेची अथवा विलीनीकरणाची मागणी ही राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्षांच्या घटनात्मक चौकटीत बसणारी नाही. संविधानाच्या ९१ व्या दुरुस्ती अधिनियम २००३ नुसार फुटीची तरतूद रद्द केली आहे. त्यानंतर राजकीय पुनर्रचनेमुळे अपात्रतेपासून सूट मिळवण्यासाठी एकच अपवाद आहे. १०व्या अनुसूचीतील परिच्छेद ४ नुसार विलीनीकरण झाल्यासच अपात्रतेतून सूट मिळते. भविष्यात जर कोणत्याही गटाकडून स्वतंत्र मान्यतेची किंवा वेगळ्या गटाच्या दर्जाची मागणी करण्यात आली तर त्यावर निर्णय घेण्यापूर्वी शिवसेना (उबाठा) पक्षाला आपली बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिली जावी असे पत्रात म्हटले आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, हे पत्र केवळ संसदीय प्रक्रियेचा भाग नसून पक्षातील संभाव्य बंडखोरी रोखण्याचा आणि पक्षाची अधिकृत भूमिका नोंदवून ठेवण्याचा प्रयत्न आहे.
यामुळे भविष्यात कोणताही गट स्वतंत्र मान्यतेचा दावा करत असल्यास उद्धव ठाकरे गटाला घटनात्मक आणि कायदेशीर लढाईत आधार मिळू शकतो. ठाकरे गटाचे सहा खासदार दिल्लीत दाखल झाले असून ते लोकसभा अध्यक्षांना भेटून शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देत असल्याचे पत्र देतील अशी चर्चा आहे. १९ जून रोजी शिवसेनेच्या वर्धापनदिन मेळाव्यात या सहा खासदारांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात कधी कोणता भूकंप होईल ते सांगता येत नाही. २०२४च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा विचार करता लोकसभा निवडणुकीत, त्यानंतर विधानसभा निवडणुकीत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा आणि त्यांच्या घटकपक्षांचा धुव्वा उडवला. विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला केवळ २० जागांवर समाधान मानावे लागले. तर अनेक वर्षे ताब्यात असलेली मुंबई महापालिका देखील भाजप-शिवसेना युतीने ताब्यात घेतली. ठाकरे गटाकडे असलेले ९ खासदार ही त्यांची ताकद राहिली आहे. ठाकरेंची दिल्लीतील ही ताकद कमी करण्यासाठी अधूनमधून ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा होत असते.
ठाकरेंच्या खासदारांचा एक गट फोडून तो शिंदे गटात आणणे म्हणजेच ‘ऑपरेशन टायगर’! ठाकरेंच्या ९ पैकी ६ खासदारांचा गट झाला तरच त्या गटाला मान्यता मिळू शकते, अन्यथा या खासदारांवर पक्षांतरविरोधी कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई होऊ शकते. मुंबईचे अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय पाटील व नाशिकचे राजाभाऊ वाझे हे ‘मातोश्री’शी एकनिष्ठ असल्याचे सध्या तरी दिसते. परभणीचे खासदार संजय जाधव आधीपासून नाराज असल्याची माहिती आहे. त्यांना केंद्रात मंत्रिपद देण्याचे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले आहे म्हणे. महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी प्रत्येकी १५ कोटींचा अॅडव्हान्स देण्यात आल्याचे खळबळजनक ट्विट खा. संजय राऊत यांनी केले आहे. याचा अर्थ खासदार फोडण्यासाठी घोडेबाजार सुरू आहे. गत काही वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी पहावयास मिळत आहेत. ताज्या वृत्तानुसार ठाकरे गटातील ६ खासदार शिंदे गटात सामील होणार आहेत. त्यांच्या गटाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मान्यता दिली. म्हणजे अखेर ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाले.
















