२ टक्के वाढ, ६,७९१ कोटींवर खर्च वाढला
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रीय सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात (डीए) आणि महागाई सवलतीत (डीआर) २ टक्के वाढीस केंद्र सरकारने आज मंजुरी दिली. सरकारने महागाई भत्ता ५८ वरून ६० टक्क्यांपर्यंत वाढवला. ही वाढ १ जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहे. या निर्णयामुळे सरकारच्या वार्षिक खर्चात ६,७९१ कोटींची वाढ होणार आहे. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये महागाई भत्ता ५५ वरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविला होता. मागील सुधारणा १ जुलै २०२५ पासून लागू झाली होती आणि ती थकबाकीसह दिली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. याचा फायदा अंदाजे ५०.५ लाख कर्मचारी आणि ६८.३ लाख निवृत्तीवेतनधारकांना होईल. केंद्र सरकार वर्षातून दोनदा, जानेवारी आणि जुलैमध्ये महागाई भत्ता (डीए) आणि महागाई सवलतीत (डीआर) सुधारणा करते. या निर्णयामुळे कर्मचा-यांच्या मासिक पगारात आणि निवृत्तीवेतनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ होते.
महागाई भत्ता हा सरकारी कर्मचा-यांना दिला जाणारा एक जीवनमान भत्ता आहे. त्याची गणना मूळ वेतनाच्या टक्केवारीनुसार केली जाते. वाढत्या किमतींच्या काळात कर्मचा-यांच्या वास्तविक उत्पन्नाचे संरक्षण करणे आणि त्यांचे वेतन महागाईच्या बरोबरीने राहील याची खात्री करणे, हा त्याचा मुख्य उद्देश आहे. केंद्र सरकार वर्षातून दोनदा, जानेवारी आणि जुलैमध्ये महागाई भत्ता (डीए) आणि महागाई सवलतीत (डीआर) सुधारणा करते. या निर्णयामुळे कर्मचा-यांच्या मासिक पगारात आणि निवृत्तीवेतनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ होते.

