देशात एकीकडे सत्ताधारी भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या व भाजप सरकारच्या सत्तेच्या तपपूर्तीचा सोहळा वा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. अर्थात या जल्लोषाला हरकत असण्याचे वा आक्षेप असण्याचे काहीच कारण नाही. कुठलाही राजकीय पक्ष आपले असे यश (अर्थातच राजकीय) झोकातच साजरे करेल. त्याला ‘इव्हेंट मॅनेजमेंट’चा गुरू असणारा भाजप अपवाद असण्याचे काहीच कारण नाही. त्यानुसार भाजप देशभर मोठ्या जल्लोषात ‘मोदींची तपपूर्ती’ साजरी करतो आहे. मात्र या उत्सवाचे टायमिंग सर्वसामान्यांच्या जखमांवर फुंकर घालणारे नाही तर मीठ चोळणारे ठरत असल्याने या उत्सवावर भाष्य करणे भाग पडते. देशात चौथी व दणदणीत इंधन दरवाढ मोदी सरकारने कंपन्या प्रचंड तोट्यात असल्याचे नेहमीचे रडगाणे गात केली.
त्यामुळे देशात महागाईचा आगडोंब उसळणे अपरिहार्यच व त्यात देशातील सर्वसामान्य जनता होरपळून निघणे अटळच! तर दुसरीकडे यावर्षी उन्हाळ्याने अक्षरश: कहर केल्याने सामान्य जनता या वाढत्या तापमानाने होरपळून निघाली आहे. सध्याचा उन्हाळा हा भारतीय उपखंडातील सर्वांत तीव्र आणि प्रदीर्घ उष्णतेच्या कालखंडाचा नवा विक्रम प्रस्थापित करतो आहे. त्यातच मान्सूनचे केरळमधील आगमन लांबणीवर पडल्याचे व मान्सून श्रीलंकेत रेंगाळला असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेपासून मुक्ततेच्या प्रतीक्षेत असलेल्या व ‘नवतपा’च्या प्रकोपाने होरपळत असलेल्या सामान्यांचा ताप आणखी वाढला आहे. एकंदर काय तर सामन्यांसाठी कुठूनच, म्हणजे ना सरकारकडून, ना निसर्गाकडून, दिलासादायक वृत्त नाहीच! उष्णतेच्या व महागाईच्या झळांनी होरपळत असलेल्या सामान्य जनतेने नरेंद्र मोदी व भाजप यांच्या सत्तेच्या तपपूर्ती सोहळ्यात कसे सहभागी व्हावे व तपपूर्तीचा हा सोहळा उत्साहात व दणक्यात कसा साजरा करावा, हा प्रश्नच! मात्र, हा प्रश्न केंद्रात व राज्यातही सत्तेत असणा-या भाजपला व त्यांच्या शीर्ष नेत्यांना पडत नाही. देशातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले की, केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप नेत्यांना इंधन दरवाढ करणार नाही,
या निवडणुकीच्या प्रचारात अत्यंत झोकात सामान्यांना दिलेल्या आश्वासनाचे साफ विस्मरण होऊन देशातील पेट्रोलियम कंपन्यांना हजारो, लाखो कोटी रुपयांचा प्रचंड तोटा सहन करावा लागत असल्याचे तीव्र स्मरण होते आणि देशात इंधन दरवाढ हाच हा तोटा कमी करण्याचा एकमेव मार्ग असल्याचा साक्षात्कार होतो. एकापाठोपाठ एक असे चार धक्के देत दोन आठवड्यांत चौथी इंधन दरवाढ जाहीर करून मोदी सरकार आपल्या सत्ता तपपूर्तीचे ‘रिटर्न गिफ्ट’ त्यांना सत्तेत बसवणा-या सामान्य जनतेला देते. पेट्रोल लिटरमागे २.६१ रुपये व डिझेल २.७१ रुपये वाढल्याने आता त्याचे थेट पडसाद सामान्यांच्या खिशावर उमटणार आहेत. देशात महागाईचा जो आगडोंब उसळणार आहे त्याने सामान्यांचे रोजचे जगणे त्याच्यासाठी जिकिरीचे बनणार आहे. त्यातच शेतक-यांचा पेरणीपूर्व मशागतीचा हंगाम पंपांवरील डिझेल टंचाईने दुहेरी संकटात सापडला आहे. त्यावर सरकार म्हणून उपाय काढण्याऐवजी व शेतक-यांना दिलासा देण्याऐवजी राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ शेतक-यांनाच ‘साठेबाज’ ठरवून डिझेलटंचाईचे खापर राज्यातील शेतक-यांच्या डोक्यावर फोडत आहेत. तर केंद्रात सत्तेवर असणारे मोदीजी दरवाढ, टंचाईसाठी युद्धाला दोष देत सामान्यांना काटकसरीचा सल्ला देत ज्यांच्या आततायीपणाने हे युद्ध भडकले व जग संकटात सापडले त्या ट्रम्प तात्यांच्या भेटीचे निमंत्रण स्वीकारून अत्यंत उत्साहाने आपल्या या जिगरी दोस्ताच्या गळाभेटीच्या तयारीला लागले आहेत.
महागाई व उष्णता या दुहेरी चटक्यांनी होरपळत असलेल्या जनतेबाबत त्यांना ना चिंता, ना जबाबदारीची जाणीव! उलट त्यांच्या सत्तेच्या तपपूर्तीच्या सोहळ्यात सत्ताधारी पक्षाची गल्लीपासून दिल्लीपर्यंतची नेतेमंडळी मग्न आहे. त्यामुळे सामान्यांना आता भाजीपाल्यापासून दुधापर्यंत व डाळींपासून खाद्यतेलापर्यंतच्या प्रचंड महागाईच्या भडक्याला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नाहीच! त्यात उन्हाळ्याच्या सुट्यात प्रवासही महागणार, हॉटेल महागणार म्हणून सुटीत कुटुंबासह चार दिवस कुठे फिरायला जाणेही सामान्यांना परवडणार तर नाहीच पण उष्णतेच्या वाढत्या झळा आणि तापमानाच्या प्रकोपाने ते प्रकृतीला झेपणारही नाही! मान्सूनचे आगमन लांबणीवर पडल्याने आणखी दोन-तीन आठवडे तरी उष्णतेच्या झळांपासून सामान्यांची सुटका होणे कठीणच दिसते. एकंदर पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप यांच्या सत्तेच्या तपपूर्तीच्या मुहूर्तावर देशातील सामान्य जनतेची आता अग्निपरीक्षाच सुरू झाली असून त्यांना उष्णता व महागाई या दोहोंच्या अस झळा सोसतच मोदींच्या सत्ता तपपूर्तीचा आनंद साजरा करावा लागणार आहे, हे मात्र निश्चित!ं
















