नागपूर : नागपुरातील भाजपच्या गोटातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंर्त्यांच्या गृहजिल्ह्यात अर्थात नागपुरात आयोजीत मुख्यमंर्त्यांच्याच कार्यक्रमाला दांडी मारणा-या भाजप नगरसेवकांना आता नोटीस देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी सुरेश भट सभागृहात दिव्यांगाना साहित्य वाटप शिबिराचा समारोप मुख्यमंर्त्याच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात भाजपच्या ११० नगरसेवकांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र त्यातील ४० भाजप नगरसेवकांनी दांडी मारली. परिणामी, अनुपस्थित राहणा-या नगरसेवकांची आता यादी तयार करण्यात आली असून त्यांना नोटिस बजावण्याचा निर्णय मनपा सत्तापक्ष नेते बाल्या बोरकर यांनी घेतला आहे.
दरम्यान, पूर्वसूचना आणि उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आल्यानंतरही ४० नगरसेवकांनी दांडी मारली. परिणामी या ४० भाजप नगरसेवकांना आता नोटीस बजावण्यात येणार आहे. तर अनुपस्थितीचे कारण स्पष्ट करण्याच्या सूचना या नोटीसमधून देण्यात येणार आहे. त्यामुळे आता भाजप पुढे या प्रकरणी नेमकी काय कारवाई करते का? हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी नागपूर जिल्ह्यातील अस्थिव्यंग व कर्णबधिर दिव्यांग व्यक्तींना नि:शुल्क जयपूर फूट साहित्य व सहाय्यक साधनांचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, देशभरात प्रसिद्ध झालेल्या जयपूर फूट आणि इतर दिव्यांग सहाय्यता साहित्यामुळे अनेक दिव्यांगांच्या जीवनात परिवर्तन घडवणे शक्य झाले आहे. कृत्रिम पाय, हात तसेच अन्य कृत्रिम अवयव बसविल्यानंतर दिव्यांग व्यक्तींना दैनंदिन जीवनातील विविध कामे अधिक सुलभपणे करता येतात. या माध्यमातून त्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यास मदत होते. भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती ही १९७५ पासून देशात आणि देशाबाहेर दिव्यांग व्यक्तींना सहाय्य करण्याचे उल्लेखनीय कार्य करीत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंध व शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींना विकलांग न संबोधता दिव्यांग अशी सन्मानजनक ओळख दिली. दिव्यांगांच्या अडचणी शक्य तितक्या कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून सातत्याने शिबिरे आयोजित करून दिव्यांग व्यक्तींना आवश्यकतेनुसार श्रवणयंत्र, व्हीलचेअर, अंधांसाठी काठी तसेच इतर साहित्य व उपकरणे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. राज्य सरकारने दिव्यांग व्यक्तींचे मानधन वाढवून २५०० करण्याचा निर्णय घेतला. त्यांना शिक्षण, रोजगार आणि आरोग्याच्या क्षेत्रात सन्मानाची संधी मिळावी यासाठी सरकार काम करत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.
















