नराधमाला फाशी

नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणा-या नराधम भीमराव कांबळे याला न्यायालयाने सोमवारी फाशीची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी हा निकाल दिला. या प्रकरणाचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया वेगाने पूर्ण झाल्याने हा खटला गुन्हा घडल्यापासून केवळ दोन महिन्यांतच निकाली निघाला. एकूण १३७ पानांचा हा निकाल आहे. नराधम कांबळे याला विशेष न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवले होते. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेत आरोपीला अटक केली होती. तपासादरम्यान घटनास्थळावरील पुरावे, तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही चित्रफिती, साक्षीदारांचे जबाब आणि वैद्यकीय अहवाल यांच्या आधारे आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्यात आले होते. पोलिसांनी अल्पावधीत दोषारोपपत्र दाखल करून खटल्याची सुनावणी सुरू केली होती. सरकारी पक्षाने न्यायालयात आरोपीविरुद्ध परिस्थितीजन्य तसेच न्याय वैद्यकीय पुराव्यांची साखळी सादर केली. आरोपीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याचे न्यायालयासमोर सिद्ध करण्यात सरकारी पक्षाला यश आले. या गुन्ह्याचे स्वरूप अत्यंत गंभीर आणि समाजाला हेलावून टाकणारे असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाने हा गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचा युक्तिवाद केला होता. तसेच आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणीही करण्यात आली होती. बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी त्वरित दोषारोपपत्र दाखल करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार केवळ १५ दिवसांत दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकार पक्षाची बाजू विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी मांडली. अंतिम युक्तिवादादरम्यान अ‍ॅड. मिसर आणि त्यांचे सहकारी अ‍ॅड. प्रथमेश शिंगणे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्यांचा संदर्भ देत युक्तिवाद केला. या खटल्यात १६ दिवसांत साक्षी व पुरावे नोंदविण्यात आले, २० दिवसांत अंतिम युक्तिवाद पूर्ण करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक विजयमाला पवार यांनी केला. नसरापूर हत्याप्रकरणात सरकारी पक्षाने मुलीचे कुटुंबिय, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पंच, तपास अधिकारी, न्यायवैद्यकीय तज्ज्ञ आणि डीएनए विश्लेषक यांच्यासह ५० हून अधिक साक्षीदारांची साक्ष नोंदवली. विशेष न्यायालयाने २१ मे पासून या प्रकरणाची दैनंदिन सुनावणी सुरू केली. सुनावणी दरम्यान सीसीटीव्ही चित्रीकरण, डीएनए अहवाल, शवविच्छेदन अहवाल आणि इतर न्यायवैद्यकीय पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले. गुन्ह्यापूर्वी आरोपीने घटनास्थळ व परिसरातील घरांची केलेली रेकी, मुख्य साक्षीदार आणि बालसाक्षीदार यांनी दिलेले जवाब, घटनास्थळ पंचनामे, आरोपीची ओळख परेड, जप्त मुद्देमाल हे महत्त्वाचे पुरावे ठरले.

जलदगतीने चाललेल्या या प्रकरणाचा केवळ दोन महिन्यांत निकाल लागला. अत्याचार आणि खून प्रकारात राज्याच्या न्यायव्यवस्थेच्या इतिहासात इतका जलद निकाली निघाल्याचा हा पहिलाच खटला आहे. घटनेच्या दिवशी मी घायबळांच्या शेडमध्ये गेलो. त्यावेळी तिथे मुलगी आली. तिला गाठीशेव खाण्यास दिली. तिला गोठ्यात नेताना माझा पाय घसरला. त्यामुळे मुलीच्या डोक्याला मार लागला व ती रडू लागली. तिला कॉटवर झोपवले तेव्हा ती ओरडत होती. लोक आरोप करतील म्हणून मी तिला तिथेच सोडून निघून गेलो असा आरोपीने बचाव केला होता. भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७(२) (अपहरण), ६४ व ६५ (बलात्कार), १०३ (खून), ७४ (विनयभंगाच्या उद्देशाने बळजबरी करणे), १४०(१) यासह लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (पोक्सो) कलम ४, ६, ८, १२ या कलमांनुसार दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेनुसार ती उच्च न्यायालयात निश्चित करावी लागते. त्यानुसार आता हा निकाल उच्च न्यायालयात दाखल केला जाईल. मी आज समाजाचा एक भाग म्हणून नसरापूर अत्याचार प्रकरणात मृत्यू झालेल्या मुलीची माफी मागते. समाजात आनंदाने हसत- खेळत असलेल्या या मुलीला समाजातील एका विकृतीने क्रूर अत्याचार करून तिचा खून केला. एवढ्यावरच न थांबता मृत्यूनंतर देखील त्याने त्याची विकृती दाखवली. मी एक आई आणि पोलिस अधिकारी म्हणून मुलीच्या मृत्यूनंतर तिला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे असे खटल्याचा तपास करणा-या पोलिस निरीक्षक विजयमाला पवार यांनी म्हटले आहे. कायदा आणि न्यायव्यवस्था कमजोर आहे असा सर्वसाधारण समज असतो. त्यामुळे आरोपी निर्दोष सुटतात असे मत तयार होते. नसरापूर प्रकरणात न्यायालयाने दिलेला निकाल हा कायदा आणि न्यायव्यवस्था किती मजबूत आहे हे अधोरेखित करणारा आहे.

न्यायव्यवस्था आणि संविधानाचा हा विजय आहे. आरोपी भीमराव कांबळे याला शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा त्याच्या चेह-यावर कोणतेही भाव नव्हते. निर्विकारपणे तो घडामोडी पाहत होता. त्याच्या चेह-यावर पश्चात्तापाचा लवलेशही नव्हता. आरोपीने चिमुकलीला जिवंत राहण्याचा कोणताही पर्याय ठेवला नाही. तिच्यावर अमानुष अत्याचार केले. एवढेच नव्हे तर हत्येनंतरही त्याने तिच्या मृतदेहावर लैंगिक अत्याचार केले. अशा नराधमाला फाशीची शिक्षा देखील कमीच होती. आरोपीने पीडितेसोबत घालवलेला ३९ मिनिटांचा कालावधी आणि त्यानंतर पीडितेचा झालेला मृत्यू हा ‘लास्ट सीन टुगेदर’ थिअरीचा सर्वांत महत्त्वाचा भाग ठरला. या ३९ मिनिटांत आरोपीशिवाय पीडितेच्या संपर्कात दुसरे कोणीही नव्हते, हे पोलिसांनी सिद्ध केले. आरोपीचे वय ६५ वर्षे असले तरी त्याची वासना आणि विकृती संपलेली नाही. अशा माणसाला जर जन्मठेप दिली किंवा समाजात मोकळे सोडले, तर तो समाजासाठी अत्यंत घातक ठरेल आणि समाजात चुकीचा संदेश जाईल, असे सरकारी वकिलांनी सांगितले. ही घटना केवळ समाजालाच नाही तर न्यायदेवतेच्या विवेकालाही धक्का देणारी असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. अशा परिस्थितीत पीडितेच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आणि जनतेचा कायद्यावरील विश्वास कायम ठेवण्यासाठी सर्वोच्च शिक्षा देणे आवश्यक होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन 2026 |Maharashtra Assembly Monsoon Session LIVE
01:24:02
Video thumbnail
LIVE- विधानसभा पावसाळी अधिवेशन लाइव्ह प्रेक्षपण
22:03
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये दिवसाढवळ्या फिल्मी स्टाईल चोरी; ४ लाख लंपास
01:07
Video thumbnail
Tukaram Munde LIVE :दूध उद्योगावर मोठी कारवाई? मुंढेंचे स्पष्ट संकेत
00:00
Video thumbnail
Tukaram Munde LIVE :दूध उद्योगावर मोठी कारवाई? मुंढेंचे स्पष्ट संकेत
36:07
Video thumbnail
Latur|लातूरवर पाणीसंकटाचे सावट; १३५ गावांचा पर्यायी पाणीपुरवठ्यावर आधार
03:21
Video thumbnail
Latur|घोणशी गावात तरुणाचे विद्युत खांबावर चढून आंदोलन
01:02
Video thumbnail
उत्तर प्रदेशातील कौशांबी येथे भीषण अपघात: एलपीजी टँकरचा स्फोट होऊन ४ जणांचा मृत्यू
01:51
Video thumbnail
Latur|स्मार्ट वीज मीटरवरून मनसे आक्रमक; किल्लारीत जोरदार आंदोलन!
04:33
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम; जेसीबीची धडक कारवाई
04:10
Video thumbnail
Latur| अखेर शेतकऱ्याला परत मिळाली बैलजोडी!
04:27
Video thumbnail
शिवसेना UBT प्रमुख उद्धव ठाकरे यांची स्फोटक पत्रकार परिषद लाईव्ह
08:29
Video thumbnail
लातूर-उदगीर महामार्गावर भीषण तिहेरी अपघात; कार, ऑटो आणि दुचाकीच्या धडकेत तिघे गंभीर जखमी
00:53
Video thumbnail
LIVE- विधानसभा पावसाळी अधिवेशन लाइव्ह प्रेक्षपण
04:50:10
Video thumbnail
Latur Traffic Issue|रस्ते बंद करूनही कोंडी कायम? लातूरच्या ट्रॅफिकचा प्रश्न ऐरणीवर
03:00

Latest news