नवी दिल्ली : वृत्तसंस्था
नीट पीजी २०२६ च्या उमेदवारांना आता दूरच्या परीक्षा केंद्रांवर जाण्याची किंवा ऐनवेळी प्रवासाची योजना आखण्याची घाई करावी लागणार नाही. ३० ऑगस्ट रोजी ही परीक्षा होणार आहे. केंद्र सरकारने उमेदवारांच्या सोयीसाठी अनेक नवीन नियम लागू केले आहेत. विद्यार्थ्यांना आता त्यांच्या घराच्या जवळचे परीक्षा केंद्र शोधण्याची, परीक्षा शहराबद्दल पूर्व माहिती मिळवण्याची, प्रत्येक प्रश्नासाठी अधिक वेळ मिळवण्याची आणि परीक्षेत पारदर्शकता राखण्यासाठी कडक सुरक्षा उपाययोजनांची सोय उपलब्ध असेल, असे सांगण्यात आले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ३० ऑगस्ट रोजी होणा-या नीट पीजी २०२६ परीक्षेपूर्वी हे बदल जाहीर केले आहेत. या बदलाचा उद्देश परीक्षा अधिक निष्पक्ष, सुरक्षित आणि पारदर्शक बनवणे, तसेच उमेदवारांवरील ताण कमी करणे हा आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी नीट पीजी २०२६ च्या तयारीचा आढावा घेतला आणि अधिका-यांना कोणतीही अडचण न येता सुरक्षित, तंत्रज्ञान-आधारित पद्धतीने परीक्षा घेण्याचे निर्देश दिले. त्यांनी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस, तांत्रिक टीम आणि इतर एजन्सींसोबत तयारीचा आढावा घेतला आणि उमेदवारांसाठी परीक्षा सुरळीत व निष्पक्ष होईल, याची खात्री करण्यावर भर दिला. यावर्षी नीट पीजी २०२६ साठी एकूण २७३,१८३ उमेदवारांनी नोंदणी केली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत १२.५ टक्क्यांहून अधिक आहे.
परीक्षा केंद्र निवड प्रक्रियेत सर्वात महत्त्वाचा बदल करण्यात आला. पूर्वी उमेदवारांना प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर केंद्रे दिली जात होती. आता तसे होणार नाही. नवीन प्रणालीनुसार उमेदवारांना त्यांच्या परीक्षा केंद्रासाठी ३ पसंतीची राज्ये निवडावी लागतील. उमेदवारांना त्यांच्या राज्याला प्रथम प्राधान्य द्यावे लागेल. यामुळे उमेदवारांना त्यांच्या निवासस्थानाजवळ केंद्रे मिळतील, याची खात्री करण्यास मदत होणार आहे. पूर्वी उमेदवारांना अनेकदा शहर आणि परीक्षा केंद्राबद्दलची माहिती परीक्षेच्या काही दिवस आधीच मिळत असे, ज्यामुळे व्यवस्थापनात अडचणी आणि अतिरिक्त खर्च येत असे.
यासोबतच नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेसने परीक्षेच्या पद्धतीत सुधारणा केली असून, त्यात १८० बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला, ज्यांची उत्तरे २१० मिनिटांत देणे आवश्यक आहे. पूर्वी परीक्षेत २०० प्रश्न असत आणि कमाल गुण ८०० होते. एकूण कालावधी तोच राहिला असला तरी सुधारित स्वरूपामुळे उमेदवारांना प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी अधिक वेळ मिळतो. दरम्यान, गेल्या काही वर्षांत काही विशिष्ट परिस्थितींमुळे नीट पीजी परीक्षा २ सत्रांमध्ये घेतली जात होती. परंतु आता नीट-पीजी २०२६ परीक्षा एकाच सत्रात घेतली जाणार आहे. मंत्रालयाच्या मते, परीक्षा एकाच सत्रात घेतल्याने सर्व उमेदवारांसाठी समान पातळीचे प्रश्न सुनिश्चित होतील, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे अधिक निष्पक्ष आणि पारदर्शक मूल्यांकन होईल.
जवळची केंद्रे मिळणे शक्य
पूर्वी उशिरा नोंदणी करणा-या उमेदवारांना अनेकदा जवळची केंद्रे पूर्णपणे आरक्षित आढळत असत आणि त्यांना परीक्षा देण्यासाठी दूरच्या राज्यांमध्ये प्रवास करावा लागत असे. उमेदवारांना ३० ऑगस्ट रोजी होणा-या परीक्षेच्या सुमारे ३ आठवडे आधी त्यांच्या वाटप केलेल्या परीक्षा शहराबद्दल माहिती मिळेल, ज्यामुळे त्यांना प्रवास आणि निवासाची व्यवस्था करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.
कडक सुरक्षा व्यवस्था
नीट-पीजी २०२६ परीक्षा सुरक्षित आणि पारदर्शक व्हावी, यासाठी केंद्र सरकारने सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत केली आहे. अर्जापासून ते परीक्षेच्या दिवसापर्यंत आधार-आधारित पडताळणीचा वापर केला जाईल. बोटांच्या ठशांची ओळख शक्य नसल्यास आयरीस बायोमेट्रिक प्रणालीचा वापर केला जाईल. प्रश्नपत्रिकांचे संरक्षण करण्यासाठी बहुस्तरीय एन्क्रिप्शन तंत्रज्ञान, सुरक्षित ऑफलाइन तयारी आणि परीक्षेपूर्वी नियंत्रित डिजिटल डिक्रिप्शन लागू करण्यात आले.
















