नेहरू हे नेहरूच!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून सर्वाधिक काळ सेवा देण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आणि त्यांच्या अंधभक्तांच्या उत्साहाला उधाण आले. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा निर्वाचित पंतप्रधान म्हणून ४,३९८ दिवसांचा विक्रम मोदी यांनी मोडीत काढल्याबद्दल मोदींवर स्तुतिसुमने उधळली जाऊ लागली. काही लोकांना आपण काय बरळतो आहोत याचे सुद्धा भान राहिले नाही. काहींनी देशात मोदी यांच्यासारखा नेता झालाच नाही, असे सांगून मोदी यांची नेहरूंशी तुलना सुरू केली. पंतप्रधान म्हणून १२ वर्षे पूर्ण केल्याबद्दल मोदी यांचे अभिनंदन करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळाली असून राज्यातील अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना त्यांच्या पाठिंब्यामुळे गती मिळाली अशा भावना व्यक्त केल्या. महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी ‘ऑपरेशन ब्लू स्टार’च्या ४२व्या ‘स्मृतिदिना’निमित्त शीख विभाजनवादी जर्नेलसिंग भिंद्रनवालेचे उदात्तीकरण करणा-या कार्यक्रमात उपस्थित राहून ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ कारवाईस ‘काळा दिवस’ असे संबोधले. अशा प्रकारच्या कार्यक्रमाला राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणारे ते भाजपचे पहिलेच मंत्री ठरले. ६ जून हा ‘काळा दिवस’ असल्याचे सांगत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सुवर्ण मंदिर परिसरात सैन्य पाठवून शीख समाजावर अन्याय केल्याचा आरोप महाजन यांनी केला. स्वतंत्र खलिस्तान समर्थक भिंद्रनवाले यांनी अत्यंत विचारपूर्वक शिखांच्या पवित्र स्थळाचा आश्रय घेऊन, त्यात शस्त्रसाठा केला होता. अशावेळी त्यांना तिथून हुसकावून बाहेर काढणे अत्यंत आवश्यक होते.

इंदिरा गांधी यांनी घेतलेला त्यांच्या कारकीर्दीतील तो अत्यंत धाडसी निर्णय होता. त्या निर्णयाबद्दल त्यांना स्वत:चे प्राण गमवावे लागले. जनरल अरुणकुमार वैद्य यांच्यासारखे कर्तव्यदक्ष लष्करप्रमुखही खलिस्तानवादी शीख दहशतवाद्यांच्या हल्ल्याला बळी पडले. हा इतिहास माहीत असतानाही गिरीश महाजन यांची विधाने भारतीय लष्कराच्या एका सुनियोजित शिस्तबद्ध कारवाईविषयी विनाकारण गैरसमज पसरवणारी आहेत. या सा-या एकूण प्रकाराला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. पंतप्रधानपद घटनात्मक आहे, त्या पदावरील व्यक्तीचा सन्मान राखला पाहिजे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात नेहरूंचे मोठे योगदान आहे. नेहरू, इंदिरा गांधींनी देशाची प्रतिष्ठा जपली. गांधी कुटुंबाचा त्याग मोठा आहे. देशाच्या जडणघडणीत नेहरूंनी दिलेले योगदान विसरता येणार नाही. कितीही आव आणला तरी पंतप्रधान मोदी आणि जवाहरलाल नेहरू यांची तुलना होऊ शकत नाही. आजघडीला देशासमोर खूप प्रश्न आहेत. बेकारी, आदिवासी महिला, अल्पसंख्याकांच्या समस्या आहेत.

ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांना या प्रश्नांची आस्था नाही. काही लोक देशात मोदी यांच्यासारखा नेता झालाच नाही, असे सांगून मोदी यांची नेहरूंशी तुलना करीत आहेत. मोदींना नेहरूंइतकीच पंतप्रधानपदावर काम करण्याची संधी मिळाली, ही चांगली गोष्ट आहे. त्यांना आणखी या पदावर काम करण्याची संधी मिळावी, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. यात चुकीचे असे काही नाही. नेहरूंचा काळ, त्यांचे कर्तृत्व आणि योगदानाशी त्यांची तुलना कशी होऊ शकते असा सवाल पवार यांनी केला. स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी मोलाची कामगिरी केली, हे विसरून चालणार नाही. स्वातंत्र्याआधी अनेक वर्षे नेहरू तुरुंगात राहिले, संघर्ष केला. नेहरू, इंदिरा गांधी यांनी देशाची प्रतिष्ठा वाढविण्याचे काम केले. गांधी कुटुंबाने देशासाठी मोठा त्याग केला आहे, हे विसरून चालणार नाही, असेही पवार म्हणाले. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले आहे. इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानला धडा शिकवला, बांगलादेशची निर्मिती केली.

त्यामुळे नेहरू कुटुंबाचा त्याग कुणी विसरू शकत नाही, त्यांची कुणासोबत तुलनाही होऊ शकत नाही. महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी केलेले वक्तव्य आम्हाला अजिबात मंजूर नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले. पंतप्रधान हा देशाचा आधारस्तंभ असतो. त्यांनी केलेले कार्य हे देशासाठीचे त्यांचे कर्तव्य असते. देशासाठी केलेले बलिदान विसरता येत नाही. आताचे पंतप्रधान मोदी नेहमी नेहरूंवर टीका करतात. ते अन्य कोणत्याही भूतपूर्व पंतप्रधानाचा नामोल्लेख कधीच करत नाहीत. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारताची प्रगती काय होती, हे विसरून चालणार नाही. नेहरूंनी काय केले, असा प्रश्न मोदी नेहमी करतात, त्यापेक्षा तुम्ही स्वत: काय केले ते सांगा ना! ते सांगता येणार नाही. काही केलेच नाही तर काय सांगणार? भाजपचे नेते, कार्यकर्ते मोदींचा उदो उदो करतात. उदो उदो करा, पण इतरांचा अनादर का करता? मोदी सत्तेवर आले तेव्हापासून देशाला स्वातंत्र्य मिळाले असा गैरसमज करून घेऊ नका. कोणत्याच पक्षाला कायमची सत्ता मिळत नसते. कोणी किती कर्तृत्व केले याची साक्ष इतिहास देईल. ‘मेरे देशवासियों’, ‘भाईयो और बहनों’, ‘न खाऊंगा, न खाने दूंगा’ ही वाक्ये लोक विसरणार नाहीत. पंडित नेहरूंनी १९४७ साली एका अत्यंत गरीब, फाळणीच्या जखमांनी होरपळलेल्या आणि पाचशेहून अधिक संस्थानांमध्ये विखुरलेल्या भारताची धुरा हाती घेतली होती.

साक्षरतेचे प्रमाण अत्यंत कमी होते. उपासमार शिगेला पोहोचली होती आणि देशात लोकशाही टिकेल की नाही याबद्दल जागतिक स्तरावर शंका होती. अशा काळात त्यांनी लोकशाही संस्थांची उभारणी केली. आयआयटी, आयआयएम आणि भाभा अणुशक्ती केंद्रासारख्या संस्थांची पायाभरणी केली. त्यांचा काळ हा ‘शून्यातून विश्व निर्माण करण्याचा’ होता. मोदींचे काय? नुसत्या घोषणा, आश्वासने आणि आर्थिक धक्क्याचे राजकारण! प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये, दरवर्षी २ कोटी रोजगार, शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करणे, काळा पैसा परत आणणे, स्मार्ट सिटींची उभारणी, ‘मेक इन इंडिया’द्वारे उत्पादन क्षेत्रात क्रांती, गंगा शुद्धीकरण अशा अनेक घोषणांचा गाजावाजा. १२ वर्षांनंतर काय तर यातील बहुतांश घोषणा हवेतच विरल्या! डिजिटल इंडिया, स्कील इंडिया, स्टार्ट अप इंडिया, सांसद आदर्श ग्राम योजना, आत्मनिर्भर भारत अशा योजनांचा प्रचार. प्रत्यक्षात काय.. वाढती बेरोजगारी, कृषी क्षेत्रावरील संकटे, बकाल शहरे, वाढती आर्थिक विषमता आणि महागाई, शिवाय नोटाबंदीचा दणका! इतिहास जाहिरातींनी लिहिला जात नाही हे कधी कळणार? नेहरू हे नेहरूच अन् मोदी ते मोदीच!

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28
Video thumbnail
Latur|९ ऑगस्टला नांदेडमध्ये शेतकऱ्यांचा महाएल्गार; आंदोलनाची दिशा ठरणार
01:57
Video thumbnail
Latur|भ्रष्टाचाराचा 'अंत' करण्यासाठी शेतकऱ्यांची अंत्ययात्रा! शिरूर अनंतपाळमध्ये अनोखे आंदोलन
01:26
Video thumbnail
Latur|बोगस बियाण्यांवरून रघुनाथदादा पाटील आक्रमक; कृषी कार्यालयात ठिय्या
05:21
Video thumbnail
Latur|जलजीवन मिशनची अपूर्ण कामे; ग्रामस्थांचे 'भिक मांगो' आंदोलन
01:58
Video thumbnail
Latur|पेपरफुटी प्रकरणांवर संभाजी ब्रिगेड आक्रमक; सरकारविरोधात धरणे आंदोलन
04:51
Video thumbnail
Nanded|'नाना पटोले यांना गुरू मानतो'; पाद्यपूजनावर काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्पष्टीकरण
06:36
Video thumbnail
Latur|लातूर LCB ची धडाकेबाज कारवाई; घरफोडी प्रकरणाचा मोठा खुलासा
01:06

Latest news