‘नीट यूजी’ पेपरफुटी प्रकरण ताजे असतानाच आणखी एक पेपरफुटी प्रकरण घडले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटीमुळे रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे. त्यामुळे २८ जून (रविवार) राज्यभरात होणारी शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यातील सुमारे १ लाख ८ हजार उमेदवारांना याचा मोठा फटका बसला आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची बरसात केली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जारी केलेल्या पत्रकानुसार २८ जून रोजी होणा-या टीईटी परीक्षेसाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली होती. नीट परीक्षेतील गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचे सर्व उपाय करण्यात आले होते. मात्र शनिवारी सायंकाळी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात काही प्रश्नपत्रिका विक्रीसाठी उपलब्ध असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. भिवंडी परिसरात मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी पोलिसांनी कारवाई केली. या कारवाई दरम्यान टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका जप्त करण्यात आल्या. त्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिका-यांना बोलावून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. या तपासादरम्यान जप्त करण्यात आलेल्या प्रश्नसंचातील काही प्रश्न आणि २८ जून रोजी होणा-या टीईटी परीक्षेतील प्रश्न समान असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.
या प्रकरणी भिवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष वातावरणात होणे आवश्यक असल्याचे सांगत रविवारी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. पेपरफुटीमुळे पुढे ढकलण्यात आलेली ही परीक्षा पुन्हा घेण्याच्या प्रक्रियेसाठी तीन आठवडे लागतील, असे ‘एमएससीई’च्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी सांगितले. या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र (हॉल तिकिट) लवकरच परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देणार असल्याचे परिषदेने जाहीर केले आहे. या परीक्षेसाठी पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही. त्यामुळे परीक्षेसाठी राज्यातील परीक्षार्थींकडून अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. ३७ शहरांतील १०२८ परीक्षा केंद्रांवर पुन्हा नव्याने परीक्षा घेतली जाणार आहे. या प्रकरणावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पेपरफुटी हा आता अपवाद राहिलेला नाही, तर या सरकारची ओळख बनली आहे, असे ते म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातच टीईटीचा पेपर फुटला आहे. लाखो परीक्षार्थींच्या मेहनतीवर आणि भविष्यावर पाणी फेरणा-या या रॅकेटला नेमके कोणाचे राजकीय संरक्षण आहे? असा सवाल सपकाळ यांनी केला. पेपरफुटी प्रकरणी विमानतळ परिसरातून भिवंडी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून यातील २ आरोपी बिहारमधील आहेत. एक आरोपी हरियाणाचा आहे. टीईटी पेपरविक्रीसाठी आरोपी दिल्लीतून आले होते.
राजीव शाह, आकाशकुमार (दोघेही बिहार) आणि धीरजकुमार (हरियाणा) अशी आरोपींची नावे आहेत. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे. पोलिसांना झडतीत ४ सेट पेपर मिळाले असून मोबाईल डेबिट कार्डही मिळाले आहे.आरोेपींनी या पेपरसाठी दीड कोटी रुपयांची अॅडव्हान्स मागणी केली होती. हे पेपर पुढे स्थानिक एजंटस्, कोचिंग क्लासेस किंवा उमेदवारांना मोठ्या रकमेत विकले जाणार होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाच्या ‘एसआयटी’ चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार दोन एसीपी, नऊ पोलिस निरीक्षक आणि सहायक पोलिस निरीक्षकांचा समावेश असलेली ‘एसआयटी’ स्थापन करण्यात आली होती. या प्रकरणातही कोचिंग सेंटर आणि सर्वांची चौकशी होणार आहे. प्राथमिक तपासात यात शिक्षण विभागाचा सहभाग आढळला नाही. यातील एका आरोपीने केंद्रीय विद्यालयात नोकरी लावण्यासाठी पैसे दिले होते तर एका आरोपीने टीईटीची परीक्षा दिली होती. मात्र तो नापास झाला होता. टीईटी पेपरफुटीची आणि परीक्षा पुढे ढकलण्याची घटना म्हणजे तरुणांच्या भविष्यावरील ‘दरोडा’ आहे, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. एकूणच देशाची शिक्षण आणि परीक्षा व्यवस्था आता ‘खंडणीखोरीची’ व्यवस्था बनली आहे. ज्यामुळे देशातील प्रत्येक तरुण असुरक्षित झाला आहे, असे राहुल गांधी म्हणाले. परीक्षेला फक्त २० तास शिल्लक असताना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. ही बातमी राज्यातील शिक्षक होऊ इच्छिणा-या लाखो उमेदवारांसाठी अत्यंत धक्कादायक आणि निराशाजनक होती. गत महिन्यात झालेल्या नीट परीक्षेच्या गोंधळानंतर आता राज्य पातळीवरील मोठ्या परीक्षेचा पेपर फुटल्याने देशातील परीक्षा पध्दती पुन्हा एकदा संशयाच्या भोव-यात सापडली आहे. या ताज्या गोंधळामुळे विरोधकांंनी सत्ताधारी भाजप आणि महायुती सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने टीका करताना म्हटले की, या सरकारच्या काळात एकही परीक्षा सुरळीत राहिलेली नाही. हे सरकार आता ‘पेपर लीक सरकार’ म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी या घोटाळ्यात मोठ्या अधिका-यांचा किंवा नेत्यांचा हात असल्याचा आरोप केला आहे. रोज नवनवीन परीक्षांचे पेपर फुटणे हे वरच्या पातळीवरील संगनमताशिवाय शक्य नाही.
यासोबतच त्यांनी अयोध्या राम मंदिर निधीतील कथित अपहार प्रकरणाचा दाखला देत सरकारवर निशाणा साधला. एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी सरकारच्या कार्यक्षमतेवर टीका करत मूळ मुद्यावरून लक्ष भरकटवण्याऐवजी सरकारने पेपरफुटी रोखण्यावर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला दिला. या सर्व वादावर आणि वाढत्या टीकेवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी या प्रकरणाची निष्पक्ष आणि कडक चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. एकूण प्रकार अत्यंत संतापजनक आहे. यात जो कोणी दोषी आढळेल, मग तो कोणताही भ्रष्ट अधिकारी असो अथवा संघटित टोळी, त्यांना सोडले जाणार नाही. कायद्याचा पूर्ण बडगा त्यांच्यावर उगारला जाईल, असे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांना ‘टीईटी’ उत्तीर्ण होणे अनिवार्य केल्यानंतर या परीक्षेच्या नोंदणीत वाढ झाली आहे. रविवारच्या नियोजित परीक्षेसाठी सुमारे ४ लाख २८ हजार उमेदवारांनी पेपर एक आणि पेपर दोनसाठी ६ लाख १२५ अर्ज केले होते.
















