पुन्हा महायुतीच!

महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाला असून सत्ताधारी महायुतीने या निवडणुकीत आपले एकहाती वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीत विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीची मोठी पिछेहाट झाली. राज्यातील एकूण १७ जागांपैकी महायुतीच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला. अवघ्या एका जागेवर भाजपच्या बंडखोर अपक्ष उमेदवाराने बाजी मारली. या निवडणुकीत भाजपने ११, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ३ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने २ जागांवर विजय मिळवला. एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला. १७ जागांसाठी १८ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. राजकीय गणिते आणि तडजोडींमुळे मतदानाच्या आधीच १७ पैकी ६ जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते.

महायुतीतील जागावाटपाच्या सूत्रानुसार भाजपने ११, शिवसेनेने ४ तर राष्ट्रवादी काँगेसने २ जागांवर आपले उमेदवार रिंगणात उतरवले होते. भाजपने आपल्या कोट्यातील ११ पैकी ११ जागा जिंकून तर राष्ट्रवादी काँग्रेसने २ पैकी २ जागांवर विजय मिळवत १०० टक्के यशाची नोंद केली. महायुतीला एकमेव धक्का शिवसेनेच्या कोट्यातील जागेवर बसला. शिवसेनेने ४ पैकी ३ जागांवर विजय मिळवला; परंतु नाशिकच्या जागेवर त्यांना पराभव स्वीकारावा लागला. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेची ही जागा शिवसेनेला सुटली होती आणि पक्षाने नरेंद्र दराडे यांना अधिकृत उमेदवारी दिली होती मात्र, भाजपचे स्थानिक नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांचे समर्थक गोकुळ गीते यांनी पक्षादेश झुगारून अपक्ष म्हणून बंडखोरी केली होती. या निकालावरून स्पष्ट होते की, पक्षांतर्गत असलेल्या नाशिकमधील बंडखोरीचा एकमेव अपवाद वगळता सत्ताधारी महायुतीने विरोधकांना कोणतीही संधी न देता ही निवडणूक एकतर्फी जिंकली आहे.

या निकालामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीचा आत्मविश्वास कमालीचा वाढला असेल. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा निकाल सर्वाधिक धक्कादायक आणि चक्रावून टाकणारा ठरला. या निवडणुकीत भाजपचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी महायुतीचे शिवसेनेचे (शिंदे गट) अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. या धक्कादायक निकालामुळे महायुतीच्या गोटात खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. महायुतीच्या जागा वाटपामध्ये नाशिकची ही प्रतिष्ठेची जागा शिवसेनेच्या वाट्याला आली होती. पक्षाने विद्यमान आमदार नरेंद्र दराडे यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी बहाल केली होती. उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान भाजपचे नेते गिरीश महाजन यांचे समर्थक आणि भाजपचे स्थानिक नेते गणेश गीते यांच्यासह त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करत महायुतीसमोर मोठे आव्हान उभे केले होते. पक्षश्रेष्ठींच्या दबावानंतर गणेश गीते यांनी विहित मुदतीपूर्वी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता; परंतु त्यांचे बंधू गोकुळ गीते हे निवडणुकीच्या रिंगणात ठाम राहिले. त्यांनी मुदत संपल्यानंतरही आपला अर्ज मागे न घेतल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली होती. भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी नरेंद्र दराडे यांचा दणदणीत पराभव केला.

पराभवाने संतापलेल्या दराडे यांनी गिरीश महाजन यांच्यासह तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी आणि मतदारांनी आपला विश्वासघात केल्याचा खळबळजनक आरोप केला. ही जागा शिंदे गटाला सोडली होती तरीही भाजपच्या गीते बंधूंनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला. ही बंडखोरी नव्हती तर भाजपने रचलेले पूर्वनियोजित नाटक होते. गिरीश महाजन बंडखोरी केलेल्या गीते बंधूंची समजूत काढायला आले. गणेश गीते यांनी माघार घेतली; पण गोकुळ गीते यांनी माघार घेतली नाही. त्यांच्या माघारीसाठी प्रयत्न करीत असल्याचे नाटक महाजन करीत राहिले. भाजपने गोकुळ गीतेंवर कोणतीच कारवाई केली नाही म्हणजेच हा कट आधीच शिजला होता. शिंदे यांच्या उमेदवाराला भाजपने सुनियोजितरित्या पाडले. गोकुळ गीते विजयी होताच एकनाथ शिंदे यांनी वेगळीच चाल खेळली. त्यांनी गीतेंना तातडीने मुंबईला बोलावून घेतले. त्यांच्यासाठी खास विमानही पाठवले. गीते यांना सहयोगी सदस्यही करून घेतले. शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी भेट झाल्यानंतर गोकुळ गीते म्हणाले, कार्यकर्त्यांचा आग्रह आणि दबावामुळे मी ही निवडणूक लढवली. मला एकनाथ शिंदे यांच्या सोबत भविष्यात काम करायचे आहे. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या मतांमध्ये मोठ्या प्रमाणात फाटाफूट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

क्रॉस व्होटिंगमुळे महायुतीच्या विजयी उमेदवारांना अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाली. काही मतदारसंघात महायुतीची मते फोडण्यात आघाडीच्या उमेदवारांना यश मिळाले तरीसुद्धा ही मते आघाडीच्या उमेदवारांना विजयी करू शकली नाहीत. महाविकास आघाडीचा या निवडणुकीत धुव्वा उडाला. या निवडणुकीत अनेक ठिकाणी मतदारांनी पक्षादेशाच्या विरोधात मतदान केल्याचे स्पष्ट झाले. निवडणुकीत आघाडीच्या उमेदवारांचा निभाव लागू शकला नसला तरी आघाडीच्या उमेदवारांनी परभणी-हिंगोली, सांगली-सातारा मतदारसंघात महायुतीची मते खेचण्यात यश मिळवले; मात्र अमरावतीत काँग्रेस उमेदवाराला एकही मत मिळू शकले नाही. या निवडणुकीतील एकाही जागेवर आघाडीला विजय मिळवता न आल्याने विरोधकांची संघटनात्मक ताकद, स्थानिक पातळीवरील प्रभाव याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असले तरी हे यश सत्तेवर अवलंबून असते हे स्पष्ट दिसून येते. या पूर्वी इथे काँग्रेस, राष्ट्रवादीचे वर्चस्व असायचे आता भाजपचे वर्चस्व दिसत आहे. सत्तेतील अन्य २ पक्षांनासुद्धा या निकालाने घाम फुटला असेल.

सोलापूरमध्ये मोहिते-पाटील, भंडारा-गोंदियामध्ये नाना पटोले, छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे आणि सांगली-सातारामध्ये जयंत पाटील यासारख्या प्रभावी नेत्यांच्या उपस्थितीतही अपेक्षित यश मिळू शकले नाही. हे केवळ पराभवाचे नव्हे तर सत्तेच्या प्रभावाचे प्रतीक आहे. महायुतीने या निवडणुकीत एकसंध विजय मिळवला असला तरी सत्ताधारी पक्षातील अंतर्गत स्पर्धा आणि संघर्ष याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नाशिक मतदारसंघातील निकाल हा त्याचा सर्वांत ठळक पुरावा आहे. शिंदे सेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा भाजपचे बंडखोर गोकुळ गीते यांनी पराभव केला. विशेष म्हणजे गीते यांनी दराडे यांना पाठिंबा जाहीर केला होता. पाठिंबा जाहीर केलेल्याने विजय मिळवावा ही भारतीय निवडणुकीच्या इतिहासातील पहिली वेळ असावी! स्थानिक पातळीवर सत्ताधारी घटकांमध्ये असलेली स्पर्धा, एकमेकांचा राजकीय प्रभाव कमी करण्याचे प्रयत्न आणि भविष्यातील सत्तासमीकरणांची चाचपणी यांचे हे स्पष्ट संकेत आहेत. राजकारणात वैचारिक बांधीलकीपेक्षा राजकीय गणितांना अधिक महत्त्व दिले जात आहे, असे दिसते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28
Video thumbnail
Latur|९ ऑगस्टला नांदेडमध्ये शेतकऱ्यांचा महाएल्गार; आंदोलनाची दिशा ठरणार
01:57
Video thumbnail
Latur|भ्रष्टाचाराचा 'अंत' करण्यासाठी शेतकऱ्यांची अंत्ययात्रा! शिरूर अनंतपाळमध्ये अनोखे आंदोलन
01:26
Video thumbnail
Latur|बोगस बियाण्यांवरून रघुनाथदादा पाटील आक्रमक; कृषी कार्यालयात ठिय्या
05:21
Video thumbnail
Latur|जलजीवन मिशनची अपूर्ण कामे; ग्रामस्थांचे 'भिक मांगो' आंदोलन
01:58
Video thumbnail
Latur|पेपरफुटी प्रकरणांवर संभाजी ब्रिगेड आक्रमक; सरकारविरोधात धरणे आंदोलन
04:51
Video thumbnail
Nanded|'नाना पटोले यांना गुरू मानतो'; पाद्यपूजनावर काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्पष्टीकरण
06:36
Video thumbnail
Latur|लातूर LCB ची धडाकेबाज कारवाई; घरफोडी प्रकरणाचा मोठा खुलासा
01:06

Latest news