इंग्लंडचे जगप्रसिद्ध लॉर्डस् मैदान क्रिकेटची पंढरी मानले जाते. या मैदानावर खेळण्यास मिळावे आणि विठ्ठलाचे दर्शन घडावे असे प्रत्येक क्रिकेटपटूंचे स्वप्न असते, अनेकांना विजयरूपी विठ्ठलाचे दर्शन घडतेच असे नाही, ‘विठ्ठल तो आला आला, मला भेटण्याला’ असे होतेच असे नाही. पण सोमवारी लॉर्डस्वर अवचित घडले. सा-या जगाला भारतीय रखुमायांचे दर्शन मात्र घडले. लॉर्डस्वर डौलाने तिरंगा फडकत होता तेव्हा ‘क्रिकेटचा देव’ही टाळ्या वाजवत होता. कारण क्रिकेटच्या पंढरीवर भारतीय पोरींनी इंग्लंडच्या घरात घुसून इंग्लिश पोरींना बदडले होते. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणा-या भारतीय महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली होती. लॉर्डस्वर प्रथमच महिलांचा कसोटी सामना आयोजित करण्यात आला होता. या लढतीत भारताने यजमान इंग्लंड संघाचा २७० धावांनी धुव्वा उडवला. भारतीय महिलांनी इंग्लंडमध्ये आजवर एकही कसोटी गमावलेली नाही. इंग्लंडमधील १० कसोटी सामन्यांत भारताने ३ विजय मिळवले तर ७ लढती अनिर्णीत राखल्या आहेत. १४२ वर्षांपूर्वी लॉर्डस्वर पुरुषांचा पहिला क्रिकेट सामना खेळवण्यात आला होता. जुलै १९७६ मध्ये येथे महिलांचे मर्यादित षटकांचे आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करण्यास सुरुवात झाली.
मात्र लॉर्डस्वर महिलांच्या कसोटी सामन्यांना डावलले जायचे. पुरातन-परंपरावादी इंग्लंडमध्ये काल-परवापर्यंत लॉर्डस्च्या पॅव्हेलियनमध्ये महिलांना प्रवेशबंदी होती. अलिकडे इंग्लिश माणूस थोडासा माणसाळला आहे. इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिलांचा अॅशेस सामनादेखील आजवर लॉर्डस्वर झाला नव्हता. अखेर ही कोंडी फुटली. १९७६ मध्ये लॉर्डस्वर झालेल्या महिलांच्या पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त यंदा येथे कसोटी सामना खेळवण्यात आला. भारतीय महिलांना या लढतीत खेळण्याची संधी मिळाली. या लढतीनिमित्त इंग्लंडच्या ५० माजी महिला क्रिकेटपटूंचा गौरव करण्यात आला. सोमवारी भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडचा दुसरा डाव ६२.५ षटकांत १८६ धावांत गुंडाळला. फिरकीपटू स्नेह राणाने ४ तर दीप्ती शर्मा, क्रांती गौड व सायली सातघरेने २ बळी घेतले. पहिल्या डावात भारताने २८५ पर्यंत मजल मारली होती तर क्रांतीच्या ५ बळींमुळे इंग्लंडचा डाव १७० धावांत गुंडाळला गेला होता. दुस-या डावात यास्तिका भाटियाच्या शतकाच्या जोरावर भारताने ३४१ धावांचा डोंगर उभा करत इंग्लंडला विजयासाठी ४५७ धावांचे अशक्यप्राय आव्हान दिले होते. इंग्लंडतर्फे सोफी एक्लेस्टोनने अर्धशतकी खेळी करत कडवी झुंज दिली परंतु ती इंग्लंडचा पराभव टाळू शकली नाही. पहिल्या डावात ५ बळी घेणा-या क्रांती गौडला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. भारत टी-२० विश्वचषकाचा गतविजेता आहे.
परंतु यंदा भारतीय संघाला अपयशाचा धनी व्हावे लागले होते. यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघाला उपान्त्य फेरीही गाठता आली नव्हती. ते अपयश बाजूला सारून भारतीय संघाने कसोटी सामन्यात मुसंडी मारली. मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदारच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक कर्मचा-यांनी खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. हरमनप्रीतने सपोर्ट स्टाफचे आभार मानले असून त्यांच्या मार्गदर्शनामुळे खेळाडूंना खेळपट्टीवरील बदलांचा अंदाज घेणे सोपे झाले असे म्हटले आहे. भारताने दिलेल्या ४५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना तिस-या दिवशी इंग्लंडचे ५ खेळाडू बाद झाले होते. चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लंडचे फलंदाज ९० मिनिटांपेक्षा जास्त काळ तग धरू शकले नाहीत. इंग्लंडच्या एमी जोन्सला ५४ धावांवर स्नेह राणाने बाद करत भारताला दिवसातले पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर सोफी एक्लेस्टोनने वाँगसोबत काही काळ प्रतिकार केला. दीप्ती शर्माने वाँग आणि बेलला लागोपाठ बाद करत इंग्लंडचे शेपूट गुंडाळले. स्नेह राणाने एक्लेस्टोनला बाद करताच भारतीय संघाने मैदानात जल्लोष सुरू केला. सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी क्रिकेटचा गॉड सचिन तेंडुलकरने भारतीय संघाला मार्गदर्शन केले होते. भारताच्या ऐतिहासिक विजयाचा पाया स्मृती मानधना आणि यास्तिका भाटियाने रचला. यास्तिकाने तिस-या दिवशी संस्मरणीय शतक ठोकले.
अर्थात तिला दैवाची साथही मिळाली.खरे तर यास्तिकाला अर्धशतकी मजलही मारता आली नसती. कारण एक चेंडू तिच्या बॅटची कड घेऊन स्टम्पवर आदळला होता पण बेल्स पडल्या नव्हत्या. गोलंदाजीत क्रांती गौडची कामगिरी विसरता येणार नाही. पहिल्या डावात ५ आणि सामन्यात एकूण ७ बळी घेणा-या गौडने आणि यास्तिकाने लॉर्डस्च्या मानद फलकावर आपले नाव कोरले आहे. वेगवान गोलंदाज गौड आणि सायलीने खेळपट्टीवरील उताराचा प्रभावी वापर करत इंग्लंडच्या गोलंदाजांपेक्षा सरस कामगिरी केली तर फिरकीपटू राणाने इंग्लिश संघाला कायम दबावाखाली ठेवले. पहिल्या डावावर भारतीय संघाला ११५ धावांची आघाडी मिळाली होती. इथेच इंग्लिश संघाचे अर्धे अवसान गळाले होते. यास्तिकाने लॉर्डस्वर ऐतिहासिक शतक ठोकले. कसोटीमधील तिचे हे पहिलेच शतक. लॉर्डस्वर शतक ठोकणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली. भारतीय महिला संघाने लॉर्डस्वर २७० धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. हा विजय महिला क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल यात शंका नाही.
















