लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयात मार्च पासून उन्हाच्या झळा तीव्र स्वरूपात जाणवत आहेत. मे महिण्याच्या अखेरीस सुर्याच्या आगीने बागायती पिकांची होरपळ सुरू झाली होती. मांजरा (धनेगाव) प्रकल्पातून तीस-या उन्हाळी हंगामाद्वारे उजव्या व डाव्या कालव्यात १५ मे पासून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे सुमारे तीन हजार हेक्टर क्षेत्रावरील बागायती पिकांना संजीवनी मिळाली आहे.
लातूर जिल्हयात गेल्यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने शेतकरी बागायती क्षेत्राकडे मोठया प्रमाणात वळाले आहेत. शेतक-यांनी उपलब्ध पाण्याच्या स्त्रोतानुसार ऊस, भुईमुग, भाजीपाला, पशुधनासाठी हिरवा चारा, मका, फळ पिकांची लागवड कली आहे. या पिकांना शेतक-यांनी मार्च-एप्रिल पर्यंत उपलब्ध स्त्रोतांच्याद्वारे पिकांच्या वाढीसाठी पाणी दिले. मार्च पासून सुरू झालेल्या उन्हाळा मे महिण्यात अधिक स्वरूपात जाणवू लागला. जिल्हयात तापमाणाचा पाराही ४३ अंश सेल्सीअस पर्यंत पोहचल्याने बागायती पिकांचीही होरपळ सुरू झाली असून दुपारच्या सुमारास पिके पांढरी दिसू लागली आहेत.
मांजरा प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या कालव्याद्वारे ११ ते ३० मार्च पाण्याचे पहिले अवर्तन, १२ एप्रिल ते १ मे दुसरे अवर्तनाचे पाणी सोडण्यात आले होते. तर १५ मे पासून तीसरे उन्हाळी हंगाम पाणी आवर्तन सुरू करण्यात आले असून ५ जून पर्यंत ते सुरू राहणार आहे.
या पाण्याचा सुमारे ३ हजार हेक्टरवरील पिकांना लाभ होत असून यात ८० टक्के पिक हे ऊसाचे आहे. शेतक-यांही उन्हाळी हंगामात या पाण्याची वाट पाहतात. या पाण्यावरच बागायती पिकांची मोठया प्रमाणात मदार आहे.
















