विधान परिषद निवडणुकीत शिंदे सेनेला हव्यात ७ जागा
मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या १७ जागांसाठी लागलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपावरून मोठा पेच निर्माण झाल्याचं चित्र समोर येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने या निवडणुकीत ७ जागांवर आपला ठाम दावा केला आहे. शिवसेनेने भाजपसमोर आधीच्या ५ आणि नव्याने ताकद वाढलेल्या २ अशा एकूण ७ जागांचा अधिकृत प्रस्ताव ठेवला होता. त्यावर अद्याप मतैक्य झालेले नाही. अजूनही यावर शिवसेना ठाम आहे. त्यामुळे पेच निर्माण झाला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार भाजपकडून शिवसेनेच्या या प्रस्तावाला फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. भाजपने शिवसेनेला केवळ ३ ते ४ जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आता शिवसेनेने ७ जागांवर ठाम राहण्याचा निर्णय घेत भाजपची कोंडी केली. शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली. सरनाईक म्हणाले, विधानपरिषदेसाठी कोणाला उमेदवारी द्यायची, याचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. यापूर्वी धुळे, कोकण या भागांत आमचे ५ आमदार होते. आता पक्षाची ताकद वाढलेली असल्यामुळेच आम्ही ७ जागांची मागणी केली. यावर महायुतीचे प्रमुख नेते एकत्र बसून अंतिम निर्णय घेतील.
माघार न घेण्याचा निर्धार
पक्षाने आता कोणत्याही परिस्थितीत माघार न घेण्याचे ठरवल्याची माहिती आहे. लोकसभा, विधानसभा आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या जागावाटपाच्या वेळी शिवसेनेने स्वत:ची ताकद जास्त असतानाही नेहमीच कमी जागा घेऊन तडजोड केली. मात्र, विधान परिषदेच्या निवडणुकीत पुन्हा तोच प्रकार सहन केला जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका शिवसेनेने घेतल्याची माहिती आहे.
















