मुंबई : प्रतिनिधी
‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर आज दुपारी ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरेंची खासदारांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला दिल्लीतील सर्व खासदारांना मुंबईत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले, तसेच पक्षांतर्गत रणनीतीवर बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या बैठकीला येताना संजय दीना पाटील यांच्या कारचा अपघात झाला आहे. विक्रोळी महामार्गावर ताफ्यातील गाड्या एकमेकांवर आदळल्या ज्यामुळे किरकोळ अपघात झाला. या अपघातामुळे त्यांना बैठकीसाठी येण्यास उशीर झाला. ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील हे जवळपास दीड तासानंतर बैठकीसाठी उपस्थित झाले.
सध्या राजकीय वर्तुळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’ या गुप्त मोहिमेची जोरदार चर्चा रंगली आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे एकूण ९ खासदार निवडून आले आहेत, परंतु त्यापैकी ७ खासदार हे सातत्याने सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याचा दावा राजकीय गोटातून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून बैठक बोलवण्यात आली.
लोकसभेच्या निकालानंतर राज्यातील राजकीय वातावरण अत्यंत अस्थिर झाले असून, सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील नेत्यांमध्ये पडद्याआड अनेक घडामोडी घडत आहेत. जर या बैठकीला काही खासदारांनी दांडी मारली, तर पक्षामध्ये पुन्हा एकदा मोठी फूट पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळेच आजच्या या ‘मातोश्री’वरील बैठकीच्या निकालाकडे आणि खासदार वाकचौरेंच्या पुढील भूमिकेकडे राजकीय विश्लेषकांचे बारीक लक्ष लागून राहिले आहे.
















