मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात मान्सूनचा पॅटर्न गेल्या पाच वर्षांत बदलत आहे. ५ वर्षांत जून महिन्यात पावसाचे दिवस कमी-अधिक होत आहेत. त्यातच ‘कमी दिवसांत अतिवृष्टी’ म्हणजे ‘इंटेन्स स्पेल’ होत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. ‘महारेन’ प्रणालीतून प्राप्त अधिकृत आकडेवारीचे विश्लेषण केले असता, राज्याची पावसाची सरासरी जरी कागदावर ९९ टक्क्यांच्या आसपास दिसत असली, तरी प्रादेशिक पातळीवर भीषण असमतोल निर्माण झाला आहे.
गेल्या पाच वर्षांत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील बंपर पावसामुळे राज्याची एकूण सरासरी भरून निघाली. इतर विभागात अपेक्षित पाऊस बरसला नाही. यंदा सलग तिस-या वर्षी छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा), नाशिक विभाग (उत्तर महाराष्ट्र) आणि विदर्भ संकटात सापडण्याची चिन्हे आहेत.
पावसाचे दिवस घटल्याचा शेतीवर परिणाम
हवामान विभागातील वैज्ञानिक एस. डी. सानप म्हणाले की, जूनमध्ये १० ते ११ दिवसांतच महिन्याचा ८० टक्के पाऊस पडतो, तेव्हा शेतात पाणी साचून पेरणी कुजते किंवा वाहून जाते. उर्वरित महिना कोरडा गेल्याने पिके करपतात आणि दुबार पेरणीची वेळ येते. ‘इंटेन्स स्पेल’मुळे पाणी वेगाने वाहून जाताना सुपीक मातीचा वरचा थर वाहून नेतो. त्याने जमिनीची सुपीकता घटते. कमी दिवसांत जास्त पावसाने विहिरी कोरड्याच राहतात. त्याचा फटका रबी हंगामाला बसतो.
एल निनोचा परिणाम
नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रातील डॉ. प्रवीणकुमार यांनी सांगितले की, २०२३ मध्ये अत्यंत तीव्र एल निनोमुळे ऑगस्टमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागात केवळ ७ दिवस पाऊस पडला. २०१५ मध्ये गेल्या १४० वर्षांतील हा सर्वांत तीव्र एल निनो होता. ज्यामुळे मान्सूनमध्ये ३० टक्के ते ४० टक्के घट झाली. लातूरचे मांजरा धरण कोरडेठाक झाले. लातूरला विशेष वॉटर ट्रेनने पाणी पुरवावे लागले होते. २००९ हे तीव्र एल निनोचे वर्ष होते. जुलै व ऑगस्ट महिन्यांत पावसाने संपूर्ण दांडी मारल्यामुळे खरीप पिके पूर्ण करपली होती.
पाणी टंचाईचे संकट
पावसाअभावी जिल्ह्यातील पाणी टंचाईचे संकटही गंभीर बनले आहे. अनेक धरणे, तलाव आणि विहिरींमधील जलसाठा कमी झाला असून जिल्ह्यातील शेकडो गावे आजही टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. ग्रामीण भागात पाण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत असून पावसाला उशीर होत असल्याने टंचाईची तीव्रता वाढत आहे.
मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता
१५ ते १९ जून दरम्यान तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो. २५ जून ते १ जुलै दरम्यान मान्सूनचे वारे वाहतील. पण पावसाची शक्यता धूसर आहे. विदर्भात १४ ते १७ जून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. सेवानिृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे म्हणाले की, सध्या मान्सूनपूर्व पावसाचे वातावरण तयार झाले आहे. रविवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तापलेला असेल.
मान्सूनच्या प्रतीक्षेत रायगड; पेरण्या खोळंबल्या
यंदा देशात मान्सूनचे आगमन वेळेवर झाले असले तरी रायगड जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मान्सूनचा प्रवास मंदावल्याने जिल्ह्यातील शेतकरी, नागरिक आणि प्रशासनाची चिंता वाढली असून पावसाअभावी भात पेरणीची कामे खोळंबली आहेत. वाढत्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असून पाणीटंचाईचे संकटही अधिक गडद होत चालले आहे.
















