रायगड : प्रतिनिधी
रायगडमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका आईने स्वत: विष प्राशन करण्यापूर्वी आपल्या चार निष्पाप आणि लहान मुलांना थंडपेयातून विष पाजल्याची भीषण घटना घडली आहे. या घटनेत आईसह तिच्या दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे, तर दोन मुलांची प्रकृती चिंताजनक आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासी वाडीवर घडली आहे. आशा जाधव (वय २९ ) असे आईचे नाव आहे. आशा यांनी आपल्या चार मुलांना थंडपेयातून विष दिले आणि त्यानंतर स्वत:ही विष पिऊन जीवनयात्रा संपवली.
या घटनेत आई आशा जाधव, मुलगी नंदिनी जाधव (वय ७) आणि दुसरी मुलगी दुर्गा जाधव (वय ६) या तिघांचा मृत्यू झाला आहे. आशा जाधव यांची इतर दोन मुले सुदैवाने बचावली असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. सध्या या दोन्ही मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू असून डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.
















