लातूर : प्रतिनिधी
शिक्षण विभागाकडून आरटीईच्या मोफत प्रवेशाच्या २ हजार १७३ जागेसाठी मोफत प्रवेश प्रक्रीया राबविण्यात आली. पाच टप्यात इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी मोफत प्रवेश प्रक्रीया राबवूनही ३०५ जागा शिल्लक राहिल्या आहेत. पालकांनी शाळा सोयीची नसल्याचे कारण पुढे करत अनेक मोफत प्रवेश नाकारले. पहिल्या फेरीनंतर चार प्रतिक्षा याद्या लागूनही प्रवेशाच्या जागा शिल्लक राहिल्या. सदर प्रक्रीयेचा शेवटचा टप्पा ९ जून रोजी पार पडला.
आरटीईतंर्गत पालकांच्या पाल्यांना पहिलीच्या वर्गासाठी २५ टक्के मोफत प्रवेश देण्यासाठी लातूर जिल्हयातील स्वंय अर्थसहित, विना अनुदानीत २०६ शाळांची २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी नोंदणी झाली होती. २०६ शाळेतील २५ टक्के मोफत २ हजार १७३ जागेसाठी ६ हजार ५३१ अर्ज वैध ठरवण्यात आले होते. या आलेल्या आर्जातून मोफत प्रवेशाची सोडत कढण्यात आली. या लॉटरीत २ हजार १२० विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यापैकी १ हजार ४३९ विद्यार्थ्यांचे पहिल्या फेरीत प्रवेश निश्चित झाले. उर्वरीत प्रवेश चार प्रतिक्षा यादीनुसार टप्या-टप्याने पार पडले. यात पहिल्या प्रतिक्षा यादीत २७७ प्रवेश झाले. दुस-या प्रतिक्षा यादीत १०२ प्रवेश झाले, तिस-या प्रतिक्षा यादीत ४० प्रवेश झाले, तर चौथ्या प्रतिक्षा यादीत केवळ १० प्रवेश झाले. एकूण २ हजार १७३ जागेच्या नुसार १ हजार ८६८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. तर ३०५ जागा एकूण पाच प्रवेश फे-या होऊनही शिल्लक राहिल्या आहेत.

