Homeमहाराष्ट्रयापुढे काळजी घेऊ : गिरीश महाजन

यापुढे काळजी घेऊ : गिरीश महाजन

मुंबई : महिला आरक्षण विधेयक संमत न झाल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (२१ एप्रिल) वरळीत महायुतीकडून जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मात्र या मोर्चात एक वेगळाच पेच पाहायला मिळाला. मोर्चामुळे झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीत तासाभरापासून अडकलेल्या एका सामान्य महिलेचा संयम सुटला आणि तिने त्यावेळी रस्त्यावर चांगलाच गोंधळ घातला. गाडीतून उतरून मोर्चाच्या ठिकाणी जाणा-या मंत्री गिरीश महाजन आणि पोलिसांना झापल्याचे काही व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याप्रकरणी आता गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गिरीश महाजन म्हणाले की, महिला आरक्षण मंजूर न झाल्यानंतर हजारो महिला, मुंबई असो, दिल्लीत असेल, लखनौ असेल सर्व देशभर त्या रस्त्यावर उतरल्या होत्या. काँग्रेसने महिला आरक्षणाचे जे बिल होते, त्याविरोधात मतदान केले. आपल्या मित्रपक्षांनाही विरोधात मतदान करायला लावून बिल पास होऊ दिले नाही. त्यामुळे महिलांमध्ये मोठा आक्रोश होता, संताप होता. म्हणून हजारो महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. मोर्चाचे नियोजन मुंबईतील वरळी येथे झाले होते.

हजारो महिला मोर्चामध्ये असल्याने वाहतूक कोंडी झाली होती. सर्वच पक्षांचे मोर्चे निघत असतात, त्यावेळी थोडीफार कोंडी होत असते. काल मोर्चा निघाला असताना त्याठिकाणी एक महिला आली आणि त्यांनी खूपच संताप व्यक्त केला. त्या फारच चिडलेल्या होत्या. वाट्टेल तसं त्या बोलत होत्या. त्यांनी तसं बोलायला नाही पाहिजे होतं. पोलिसांना त्यांनी तक्रार द्यायला पाहिजे होती. मी त्याठिकाणी उपस्थित होतो. तिथेही त्या आल्या आणि रस्ते तुम्ही बंद कसे करू शकता? त्या आक्षेपार्ह भाषेत बोलत होत्या आणि ते मी आता सांगू शकत नाही. तुम्ही मैदानावर मोर्चा काढा, रस्त्यावर उतरू नका, असेही ती महिला सांगत असल्याचे महाजन यांनी सांगितले.

गिरीश महाजन म्हणाले की, पोलिसांनी त्या महिलेला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी पोलिसांसोबतसुद्धा नको त्या भाषेत वाद घातला. परंतु आम्ही सर्वांनी अतिशय संयमाची भूमिका घेतली होती. मी त्यांना सांगितले की, आम्ही पुढच्या १० ते १५ मिनिटांमध्ये रस्ता मोकळा करू. पण ती महिला अजिबात ऐकायला तयार नव्हती. त्या महिलेने पाण्याची बाटली मोर्चावर फेकून मारली. हे सर्व व्हीडीओच्या माध्यमातून दिसत आहे. त्यामुळे आमच्याही महिला कार्यकर्त्या संतापल्या होत्या. पण आम्ही त्यांना सांगितलं की, त्या महिलेला बोलू द्या. त्यानंतर १० ते १५ मिनिटांमध्ये ती महिला निघून गेली.

एवढाच प्रकार त्याठिकाणी झालेला आहे. पण कालचा मोर्चा महिलांसाठीच आणि महिला आरक्षणासाठी निघालेला होता. मात्र वाहतूक कोंडीमुळे त्या महिलेला खूप राग अनावर झालेला होता. त्यामुळे ती बोलत होती. पण यापुढे निश्चित आम्ही काळजी घेऊ. मोर्चा किंवा आंदोलन असेल तेव्हा असे प्रकार नेहमी घडत असतात. पण पुन्हा मी सांगेल की, आम्ही यासंदर्भामध्ये यापुढे अधिक काळजी घेऊ. पण ती महिला जे काही बोलली ती भाषा योग्य नव्हती. त्यांनी त्यांचा मुद्दा वेगळ्या प्रकारे मांडायला पाहिजे होता. आम्ही मोर्चाची परवानगी घेतली होती. मोर्चाचा रूटही आम्ही दिलेला होता. त्यामुळे मला असं वाटतं की, त्याठिकाणी लोकांना काही त्रास झाला असेल. पण प्रत्येक मोर्चावेळी लोकांना त्रास होत असतो, हेही खरे असल्याचे गिरीश महाजन म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR