मुंबई : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या तापमानात कमालीचा चढ उतार पाहायला मिळत आहे. त्यामुळे दिवसा उन्हाचे चटके आणि रात्रीचा काहीसा गारवा असा अनुभव राज्यभरातील अनेक भागातील नागरिकांना येत आहे. त्यामुळे हिवाळा अजून संपला नसला तरी उन्हाळ्याच्या दिशेने तापमानाची वाटचाल सुरू झाल्याचे आता पाहायला मिळत आहे. मुंबईत आधीच दमट हवामान असताना दुपारी १२ वाजेनंतर कडक ऊन आणि रात्री १० वाजेनंतर गारव्याचा अनुभव मुंबईकरांना येत आहे.
उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली असून झालेल्या बर्फवृष्टीमुळे याचा इतर राज्यातील हवामानावर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर, येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील तापमान वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
सध्या राज्यात अनेक भागात कोरडे वारे वाहत आहेत. यामुळे गरम हवेच्या खालच्या थरात थंड हवा अडकून पडल्यासारखे जाणवत आहे. यामुळे तापमान वाढले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागू शकतो. साधारणपणे १० ते १२ फेब्रुवारीनंतर हिवाळा आणि उन्हाळा या दरम्यानचा वारे बदलाचा काळ सुरू होऊ शकतो. मात्र, यावर्षी हा काळ लवकर सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत, अशी माहिती हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे. मुंबईत सकाळी धुरकट वातावरण तर दुपारी आकाश निरभ्र असेल. कमाल तापमान ३५ अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता असल्याने उन्हाचा चटकाही जाणवणार आहे. आज राज्यात संमिश्र हवामान राहण्याची शक्यता आहे. काही भागांत थंडीची लाट येण्याचे संकेत आहेत.

