लातूर : प्रतिनिधी
लोकनेते विलासराव देशमुख ग्रामीण टी-१० क्रिकेट स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडत आहे. शुक्रवारी या स्पर्धेत लातूर लॉयन्स, चाकूर चाजर्स, उदगीर अनटाईड, जळकोट टायटन्स या संघांनी विजय मिळवत आपले स्थान अधिक बळकट केले आहे. शुक्रवारी रेणापूर रॉयल संघाने प्रथम फलंदाजी करताना १० षटकात चार गडी गमावून ११० धावा केल्या. यात रोहन रेड्डीने सर्वाधिक ३८ चेंडूत ८५ धावा केल्या. तर तसेच ११० धावांचा पाठलग करताना लातूर लॉयन्सच्या एमडी मोहम्मदने सर्वाधिक ४४ धावा केल्या. लातूर लॉयन्सच्या रोहण रेड्डी व बालाजी मुंडे यांनी प्रत्येकी दोन फलंदाजांना तंबूत धाडले. लातूर लॉयन्सने ७.४ षटकात ५ गडी गमाून १११ धावा करत विजय मिळवला.
तसेच चाकुर चार्जरसने देवणी डेअरडेव्हील संघास ११५ धावांचे उद्दिष्ट दिले होते. मात्र देवणी डेअरडेव्हील संघाने १० षटकात प्रयत्न करूनही १० गडी गमावून ९४ धावापर्र्यंतच मजल मारता आली. यात चाकुर चार्जरसचा २१ धावांनी विजय झाला. तसेच शिरुर अनंतपाळ स्ट्रायकरने उदगीर युनायटेड संघास १० षटकात ८० धावा काढण्याचे उद्दिष्ट दिले होते. उदगीर युनायटेड संघाने सदर उद्दिष्ट ९.५ षटकात ७ गडी गमावून ८२ धावा करत रोमाहर्षक विजय मिळवला. तर जळकोट टायटन्सच्या विरोधात ग्रामीण इंडियन्स संघाने १० षटकात ९ गडी गमावून ९४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात जळकोट टायटन्सने ६ गडी गमावत ८.२ षटकात ९८ धावा करत उद्दिष्ट पूर्ण करत दमदार विजय मिळवला
लोकनेते विलासराव देशमुख ग्रामीण टी-१० क्रिकेट स्पर्धेची संकल्पना माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांची आहे. ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंचे क्रीडा कौशल्य पाहूण क्रीडा प्रेमी भारावून जात आहेत.
















