नांदेड : प्रतिनिधी
काँगे्रस सोडून भाजपात गेलेल्या खा. अशोकराव चव्हाण यांना आता लोकांनी नाकारले आहे. तर दुस-या चव्हाणांना स्वीकारले आहे, यामुळे लोकसभा निवडणुकीत आपला १ लाखांच्या लिडने विजय होईल असा दावा नांदेड लोकसभा उमेदवार वंसतराव चव्हाण यांनी केला. नवा मोंढा येथील काँग्रेस कार्यालय निवडणुकीनंतर मंगळवारी सकाळी आघाडीची पत्रकार परिषद झाली. यावेळी ते बोलत होते. परिषदेस माजी आ. ईश्वरराव भोसीकर, काँगे्रस जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, शहराध्यक्ष अब्दुल सत्तार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष डॉ. सुनिल कदम, उबाठाचे सहसंपर्क प्रमुख दत्ता कोकाटे, एकनाथ मोरे, भगवानराव आलेगावकर यांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना वंसतराव चव्हाण म्हणाले की, माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी काँगे्रस सोडल्यामुळे काही फरक पडणार नाही, हे मी पहिल्याच सभेत दंड थोपटून सांगीतले होते. काही पदाधिकारींनी भाजपात पलायन केले परंतू निवडणुकीत आघाडीतील पदाधिकारी, सर्वसामान्य लोक आमच्यासोबत होते. यामुळे १ लाखांच्या लिडने मी विजयी होईल. नांदेड सोबत राज्यात आघाडी ३२ ते ३५ जागा जिंकेल. येत्या ४ जून रोजी सर्व चित्र स्पष्ट होईल, तोपर्यत वाट पाहणे उचित ठरेल. लिड विषयी बोलतांना ते म्हणाले, माध्यमांचे गणित असते तसे आमचे गणित सुद्धा आहे. लोकांचा कल आमच्याकडे आहे. नांदेड जिल्ह्यात सर्व पक्षातील पदाधिका-यांनी चांगले संबध आहेत, यामुळे अदृश्य हातांची ही मदत झाली असे चव्हाण यांनी सांगीतले.
नायगाव मतदार संघातून लिड घटली, असे बोलले जात आहे. यावर चव्हाण म्हणाले जे चर्चा करीत आहेत, त्यांना भोकरमधून किती लिड मिळाली हे निकालानंतर पुढे येईल, असा टोला माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना लगावला. तर बिलोली-देगलूर मतदार संघाचे काँगे्रस आ. जितेश अंतापूर हे लोकसभा निवडणुकीत अलिप्त होते. त्यांच्यावर काय कारवाई होईल, यावर चव्हाण म्हणाले की पक्षाकडून तर कारवाई होणार आहे परंतू येणा-या विधानसभा निवडणुकीत अंतापूरकर यांना फळ मिळणार आहे.