लातूर : प्रतिनिधी
साधु-संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या लातूरच्या पवित्र परिसरात वारकरी संप्रदायाचे संस्कार आणि विचारांची मोठी देणगी लाभली आहे. समाजातील गुणवंत, यशवंत, सेवागौरव आणि आदर्श व्यक्तींचा सन्मान करणे हे अत्यंत मोठे आणि आदर्श कार्य आहे. गुणवंतांच्या पाठीवर योग्य वेळी कौतुकाची थाप देणे हे केवळ एक कौतुक नाही, तर ती विद्यार्थ्यांच्या गुणांची सर्वांगीण प्रगती करणारी ऊर्जा ठरते. या कौतुकामुळे विद्यार्थ्यांना जीवनात पुढे जाण्याची नवी प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ ह. भ. प. महादेव महाराज चाकरवाडीकर यांनी केले.
दशनाम गोसावी समाज, लातूर आणि गोसावी वुमन्स विंग आणि भारती फाऊंडेशन, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने भालचंद्र रक्तपेढी सभागृहात आयोजित ‘पंचसुत्र’ कार्यक्रमांतर्गत सत्कार सोहळ्याचे शानदार उद्घाटन हभप महादेव महाराज चाकरवाडीकर यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थान परभणीचे स्वप्निल भारती होते. ह.भ.प. महादेव महाराज चाकरवाडीकर यांनी आपल्या मार्गदर्शनात पुढे बोलताना, लातूरचे सुप्रसिद्ध बिल्डर धर्मवीर भारती यांच्या नि:स्वार्थी समाजकार्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, धर्मवीर भारती यांच्या माध्यमातून हे मोठे समाजकार्य आज आकारास आले असून ते अतिशय प्रामाणिकपणे सुरू आहे. या समाज प्रबोधनाच्या पवित्र कार्याला आणि प्रतिष्ठानच्या वाढीला माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा आहेत, अशा शब्दात त्यांनी ईश्वराकडे प्रार्थना केली.
यानंतर मुख्य वक्ते ह.भ.प. अविनाश भारती महाराज यांनी आपल्या अमोघ व प्रबोधनपर वाणीतून गोसावी समाजाला अंतर्मुख व्हायला लावणारा अत्यंत परखड संदेश दिला. ते म्हणाले की, गोसावी समाजाने आता केवळ मागणा-यांच्या यादीत न राहता, स्वत:ला शिक्षण, उद्योग आणि उच्च संस्कारांच्या जोरावर इतके सक्षम करावे की समाजाने देणा-यांच्या यादीत समाविष्ट झाले पाहिजे. प्रारंभी लातूरचे सुप्रसिद्ध बिल्डर धर्मवीर भारती यांनी अत्यंत प्रभावी प्रास्ताविक केले. दशनाम गोसावी समाजाचे व्यंकटेश पुरी यांनीही समाज बांधवांना दशनाम गोसावी समाज हा हिंदू धर्म प्रचारक, प्रसारक असल्याचे सांगून समाजाच्या कोणत्याही कार्यासाठी आपण सदैव तत्पर आहोत. यावेळी गोसावी वुमन्स विंगच्या सुरेखा धर्मवीर भारती, नाशिकचे अनुप गोसावी, मुन्ना गिरी गोसावी (पंढरपूर), ओमप्रकाश गिरी (बीड) यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला सुखदेव गिरी (कोल्हापूर), गणेश पुरी (नागपूर) यांचीही प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्यात समाजातील निवृत्त अधिकारी, विविध क्षेत्रातील समाजभूषण आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच भारती फाउंडेशनच्या वतीने अनेक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात आली. सूत्रसंचालन प्रा. मकरंद गिरी व प्रवीण गिरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दशमी नाम गोसावी समाज लातूर आणि वुमन्स विंग, लातूरच्या वतीने परिश्रम घेतले.
















